वर्धा : गोजी येथील महादेव मंदिरानजीक असलेल्या कुंडात दोन बहिणी गटांगळ्या खात होत्या. ही बाब लक्षात येताच तेथे कर्तव्यावर असलेल्या गृहरक्षकाने क्षणाचाही विलंब न करताच कुंडात उडी घेवून दोघींचेही प्राण वाचवले. ही घटना सोमवारी महाशिवरात्रीच्या पर्वावर दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. मोनू गजानन कावळे (५) आणि सोनू गजानन कावळे (४) रा. गोजी अशी या चिमुकल्यांची तर राजू गुरनुले रा. बरबडी असे गृहरक्षकाचे नाव आहे.पोलीस सूत्रानुसार, गोजी येथे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. महाशिवरात्रीला या मंदिरात भक्तांची गर्दी असते. मंदिरानजीक एक कुंड असून या कुंडातून पाणी घेवून भक्त महादेवाला अभिषेक करतात. येथीलच सोनू आणि मोनू कावळे या बहिणी दर्शनासाठी गेल्या. तत्पूर्वी त्या येथील कुंडातून पाणी आणण्यासाठी गेल्या. यावेळी अचानक मोनूचा पाय घसरुन ती कुंडात पडली. तिचा हात धरण्यासाठी सोनूने प्रयत्न केला असता ती देखील कुंडात घसरल्या गेली. कुंड २० ते २५ फुट खोल असल्याने दोघीही गटांगळ्या खायला लागल्या. ही बाब येथे कर्तव्यावर असलेल्या राजू गुरनुले या होमगार्डला लक्षात येताच त्याने तात्काळ कुंडात उडी घेवून दोघींनाही बाहेर काढल्या. जमिनीवर झोपवून त्यांच्या पोटातील पाणी काढले. याप्रसंगावधानाने दोघींचेही प्राण वाचले. सेवाग्राम पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बोंदरे आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक राऊत यांनी तात्काळ वरिष्ठांना घटनेची माहिती दिली. तसेच मंदिर प्रशासनालाही कुंडा भोवती कठडे बांधण्याचे सुचविले. विशेष म्हणजे गतवर्षी याच होमगार्डने पवनार येथे गौरी विसर्जनादरम्यान एकाचे असेच प्राण वाचविले होते.(शहर प्रतिनिधी) मंदिरातील कुंडाला कुठलीही सुरक्षा नाही ४गोजी येथे महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी असते. या कुुंडातून पाणी घेवून महादेवाला अभिषेक करण्याची प्रथा आहे. या दिवशी येथे गर्दी वाढत असताना या कुंडाला कुठलीही सुरक्षा करण्यात येत नाही. याकडे मंदिर प्रशासनाने लक्ष देण्याची गरज होती. येथे कुठलीही सुविधा नसल्याने आज येथे अनुचित घटना घडताना बचावली.
गृहरक्षकाच्या प्रसंगावधानाने वाचले दोन चिमुकल्यांचे प्राण
By admin | Updated: March 8, 2016 02:22 IST