वर्धा : राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १४ मे हा दिवस जागतिक उच्चरक्तदाब विरोधी दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यांतर्गत ‘प्रत्येकाने आपला रक्तदाब माहिती करून घ्या’ या घोषवाक्यानुसार जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रामध्ये उच्चरक्तदाब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिली. उच्च रकतदाबाविषयी लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय योजना आणि उपचार याबाबत नागरिकामध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवारी सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे.एखाद्याला उच्च रक्तदाब त्रास असल्यास चक्कर येणे, डोके दुखणे, कानामध्ये नाद होणे, गरगरणे, छातीत दुखणे, डाव्या बाजुच्या खांद्यात व हातात दुखणे, मान व जबड्याच्या खालच्या भागामध्ये दुखणे, दम लागणे, मळमळ होणे किंवा पोटात दुखणे ही लक्षणे दिसून येतात. उच्च रक्तदाबामध्ये सिस्टॉलिक रक्तदाब १४० एमएमएचजी किंवा त्यावर डॉयस्टोलिक रक्तदाब ९० एमएमएचजी किंवा त्यावर राहतो.शारीरिक निष्क्रियता, लठ्ठपणा, अहितकारी आहार, तणाव, तंबाखू सेवन मद्यपान आदींमुळे उच्च रक्तदाब हा आजार होण्याची शक्यता असते. उच्च रक्तदाब टाळण्यासाठी दररोज शारीरिक व्यायाम, आरोग्यदायी आहार, वजन कमी करणे, तणाव कमी करणे, तंबाखूचे सेवन टाळणे, मद्यपान न करणे, आवश्यक आहेत. उच्च रक्तदाब विरोधी दिनानिमित्त जनतेमध्ये मोठ्याप्रमाणात जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी रुग्णाची मोफत वैद्यकीय तपासणी, मोफत समुपदेशन, गृहभेटीद्वारे रूग्णांना वेळोवेळी मदत व मार्गदर्शन करणे व संदर्भ सेवा देणे, समुपदेशनाच्या माध्यमातून आरोग्यदायी पर्याय स्वीकारण्यास सुचविणे, काय खावे, किती खावे याचे महत्व समजावून सांगणे, व्यायामाबाबतची माहिती त्यांना समजावून सांगणे, तंबाखू, मद्यपान, अहितकारी आहार यांच्या विरूद्ध समुदायाला एकत्र आणणे, वयस्कर व्यक्तींसाठी दक्षता आणि निगा पुरविण्यासाठी स्थानिक भेटी, वृद्धावस्थेशी निगडीत आरोग्य शिक्षण, उच्च जोखीम असलेल्या व्यक्तींना वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे किंवा रूग्णालयामध्ये पाठविण्यासाठी आधार देणे, आदी उपक्रम जिल्हा सामान्य कार्यालयात राबविण्यात येणार आहे. याचा जनतेने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(शहर प्रतिनिधी)मानसिक तणाव आजाराचे मुख्य कारणधकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच मानसिक तणावातून जावे लागते. त्यातच मादक पदार्थाचे सेवन असल्यास हा आजार बळावू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहणे व मानसिक तणावाचे व्यवस्थापन कारणे गरजेचे आहे. हा आजार असलेल्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार रोजच्या रोज वेळेवर करणे गरजेचे आहे. तसेच तणावमुक्त जीवन जगणेही आवश्यक आहे. ३० वर्षावरील व्यक्तींना उच्च रक्तदाबाविषयी माहिती, उच्चरक्तदाबाची कारणे, त्यामुळे होणाऱ्या गुंतागुती याबद्दल लोकांना शास्त्रीय माहितीच्या आधारे मार्गदर्शन या शिबिरात केले जाणार आहे.आरोग्य संस्थांमध्ये ३० वर्षावरील व्यक्तींसाठी तसेच गरोदरमातांसाठी रक्तदाब तपासणी शिबिरे, आरोग्यदायक सवयी, आरोग्य जीवन जगण्याबाबतची माहिती, परिपूर्ण व आरोग्यदायी आहार, शिबिरादरम्यान निश्चित झालेल्या रूग्णांना मोफत औषधोपचार तसेच रज्तदाबाचे निदान झालेल्या रूग्णांना गुंतागुत आढळल्यास त्यांना त्या वैद्यकीय तपासण्या करून आवश्यकता असल्यास संदर्र्भित करून आजाराविषयी जनजागृती या शिबिरात केली येणार आहे.
स्वत:चा रक्तदाब प्रत्येकाने जाणून घ्या
By admin | Updated: May 14, 2015 01:57 IST