अधिकाऱ्यांशी चर्चा : समस्यांच्या सोडवणुकीकडे दुर्लक्षचकारंजा (घा.) : स्थानिक तहसील कार्यालयास जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी भेट देत पाहणी केली. जिल्हाधिकारीपदी रूजू झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच भेट होती. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी शुभांगी आंधळे, तहसीलदार बालपांडे, नायब तहसीलदार जी.सी. बर्वे, राठोड व कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण इमारत व परिसराची पाहणी केल्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून काही निर्देश दिल्याचे सांगण्यात येते. हजेरीचे बायोमॅट्रिक डिव्हाईस कागदावरच आहे. तालुक्यात इतरत्र ते कार्यरत आहे. १२ आॅगस्ट २०१४ रोजी तहसील कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी तत्कालीन जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या वास्तूचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले होते; पण दहा महिने लोटूनही त्यांच्या आवाहनाला अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. महत्वाची बाब अशी की, गत एक महिन्यापासून कडक उन्हाळा असताना पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आले. काही कर्मचारी विकतच्या कॅन घेतात. वॉटर फिल्टरची व्यवस्था असताना आठवड्यातून दोन दिवस नळ आल्यानंतर त्यात पाणी असते. एरव्ही रांजण भरले जात नाहीत. पाण्याअभावी शौचालयात पाणी टाकले जात नाही. यामुळे सर्वत्र दुर्गंधी दरवळते. रेकॉर्ड रूमजवळ अस्वच्छता असून बाजूलाच गेटवर स्वच्छता राखा, असा संदेश आहे. या संपूर्ण प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.(शहर प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांद्वारे तहसील कार्यालयाची पाहणी
By admin | Updated: June 14, 2015 02:28 IST