विरूळ (आ़) : आर्वी तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या विरूळचा कारभार सध्या रामभरोसे झाला आहे़ येथील ग्रामसेवक गोरे यांची बदली झाली आहे. तात्पुरता कारभार खरांगणा-मोरांगण्याचा ग्रामसेवकाला दिला आहे. पण ग्रामसेवक आठवड्यातून तीनच दिवस येत असल्याने विरूळ गावाचा विकास खुुंटला आहे़ त्यामुळे लवकरात लवकर कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्याची मागणी केली जात आहे़ याबाबत आर्वीचे गटविकास अधिकारी कमालीचे उदासीन असल्याचे दिसते. तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून या ग्रामपंचायतची ओळख आहे़ या गावात ग्रामपंचायतची निवडणूक न घेता गावकऱ्यांनी अविरोध अकरा सदस्यांची निवड केली आहे़ परंतु पंचायत समितीच्या उदासीन कारभारामुळे गावाला पूर्ण वेळ ग्रामसेवक न भेटणे हे एक दुर्देव असल्याचे ग्रामस्थांमधून तसेच म्हणावे लागेल़ सध्या पावसाचे दिवस सुरू आहे़ अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे़ गावालगतच रस्त्यावर लोकांनी शेणाचे ढिगारे ठेवले असल्याने आरोग्यास धोका निर्माण झाला आहे़ पिण्याच्या पाण्यात वेळेवर ब्लिचिंग पावडर टाकल्या जाते की नाही याकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे़ गावात नियमित ग्रामसचिव नसल्याने मोठ्या प्रमाणात समस्या वाढत आहे़ या समस्येमुळे नागरिकही त्रस्त आहे़ गावात कोणता शासकीय फंड येतो याची कल्पना सुद्धा गावकऱ्यांना राहत नाही़ गावकऱ्यांची खोलंबलेली कामे लक्षात घेत आर्वीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची ही मागणी लक्षात घेता कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे़(वार्ताहर)
ग्रामसेवकाअभावी ग्रा.पं.ची कामे खोळंबली
By admin | Updated: July 29, 2014 23:58 IST