लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना काळात सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे मागासवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या ५० होतकरू विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी आणि तंत्रविज्ञान पदवी शिक्षण पूर्णत: मोफत देण्याचा निर्णय सावंगी येथील दत्ता मेघे अभिमत विद्यापीठाने घेतला आहे. कुलपती दत्ता मेघे यांच्या जन्मदिनानिमित्त हा शैक्षणिक दिलासा देणारा उपक्रम या सत्रापासून राबविला जाणार असल्याची माहिती विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे यांनी पत्र परिषदेत दिली.ज्या कुटुंबातील कर्ती व्यक्ती कोरोनाने मृत पावली अथवा शेतकरी आत्महत्येत गमावली आहे, त्या परिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांना त्यात प्राधान्य देण्यात येणार आहे. या ‘फाऊंडर्स बॅच’ मधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची आणि आरोग्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणारे महत्त्वपूर्ण पाऊल मेघे आयुर्विज्ञान संस्थेकडून टाकले जात आहे. दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाला विविध अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेद्वारे मान्यता प्राप्त झाली असून त्यात आर्टिफिशल इंटेलिजन्स ॲन्ड डाटा सायन्स, आर्टिफिशल इंटेलिजन्स ॲन्ड मशीन लर्निंग, ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स ॲन्ड बायोमेडिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायन्स ॲन्ड डिझाईन या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रत्येकी ६० जागांची मंजुरी देण्यात आली आहे, असे कुलगुुरू डॉ. राजीव बोरले यांनी सांगितले. या अभ्यासक्रमाच्या प्रत्येक शाखांतील १० जागा मागासवर्गीय तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न पाच लाखांपेक्षा जास्त नाही, अशा परिवारातील विद्यार्थ्यांसाठी ‘फाऊंडर्स बॅच’ म्हणून राखून ठेवण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. किमान ६० टक्के गुण घेऊन बारावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या वर्धा जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांना या सुविधेचा लाभ आगामी चार वर्षे म्हणजेच अंतिम सत्रापर्यंत मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना कोणतेही प्रवेश शुल्क, शिक्षण शुल्क, विद्यापीठ नामांकन शुल्क, परीक्षा शुल्क लागणार नसून वसतिगृह व भोजन सुविधाही विनामूल्य असणार आहेत, असे डॉ. अभ्युदय मेघे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी १० नोव्हेंबरपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करायचे असून १० नोव्हेंबरला अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. या पत्रपरिषदेला कुलसचिव डॉ. बाबाजी घेवडे, सहकुलसचिव डॉ. सुधाकर शिंदे, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, अभियांत्रिकी शाखेचे अधिष्ठाता डॉ. के. टी. व्ही. रेड्डी, डॉ. अमित गुडधे यांची उपस्थिती होती.
अलाईड सायन्सेसमध्येही विद्यार्थ्यांना संधी- दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठात स्कूल ऑफ सायन्सेसअंतर्गत विविध अभ्यासक्रम सुरू असून या अभ्यासक्रमात एक पालकत्व असलेल्या तसेच मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या असमर्थ परिवारातील विद्यार्थ्यांना पूर्णत: नि:शुल्क प्रवेश देण्यात येणार असल्याचे डॉ. अभ्युदय मेघे यांनी सांगितले. कोरोनाने अथवा शेतकरी आत्महत्येत निधन झालेल्या परिवारातील विद्यार्थ्यांनाही या शैक्षणिक संधीचा लाभ घेता येईल. या विद्यार्थ्यांसाठी २० टक्के जागा राखून ठेवल्या जातील. या योजनेव्यतिरिक्त अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या महाराष्ट्रातील आणि अन्य राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांनाही कुलगुरू शिष्यवृत्तीच्या माध्यमातून आर्थिक दिलासा देण्यात येणार असल्याचे सांगितले.