महेश सायखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वन्यप्राण्यांकडून उभ्या पिकांचे नुकसान व मनुष्याला जखमी अथवा ठार केल्यावर वनविभागाकडून नुकसानग्रस्तांसह त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत दिली जाते. परंतु, मागील पाच महिन्यांपासून नुकसान भरपाईपोटीचा निधीच उपलब्ध न करून दिल्याने शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेली तब्बल ३,१९९ प्रकरणे सध्या रखडली आहेत. शासनाकडून निधी मिळावा म्हणून उपवनसंरक्षक कार्यालयाच्यावतीने आतापर्यंत दोन वेळा वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. लवकरच शासकीय मदत मिळेल अशी आशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आहे.प्राप्त माहितीनुसार, जानेवारी २०२० ते मे अखेरपर्यंत वन्यप्राण्यांनी उभ्या पिकांचे नुकसान केल्याची एकूण ३ हजार ३४ प्रकरणे वनविभागाला प्राप्त झाले. चौकशीअंती ही संपूर्ण प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरली. ही प्रकरणे निकाली काढत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीपोटी आर्थिक मदत देण्यासाठी १ कोटी ५१ लाख १६ हजार १३३ रुपयांची गरज आहे. परंतु, मागील पाच महिन्यांपासून वर्धा उपवनसंरक्षक कार्यालयाला शासनाकडून निधीच न मिळाल्याने शासकीय मदत वितरीत करण्यासाठी वर्ध्याचा वनविभाग सध्या हतबल झाला आहे. तर मागील पाच महिन्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्य जखमी झाल्याची १७ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले आहेत. या जखमींना एकूण १० लाख ८९ हजार ८८९ रुपयांची शासकीय मदत देण्याचेही निश्चित करण्यात आले आहे. मात्र, निधीच न मिळाल्याने हेही काम रखडले आहे. लवकरच शासनाकडून नुकसान भरपाईपोटीचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त येईल, अशी अपेक्षा वनविभागाला आहे.पशुपालकांच्या अडचणीत भरवन्यप्राण्यांनी पाळीव जनावरांना ठार केल्याची १४८ प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली आहे. या प्रकरणांचा अंतिम निपटारा करण्यासाठी सदर पशुपालकांच्या बँक खात्यात झालेल्या नुकसानीपोटी १३ लाख २३ हजार ५६४ रुपये वळते करणे क्रमप्राप्त आहे. परंतु, निधीच नसल्याने शासकीय मदत त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नसल्याने नुकसानग्रस्त पशुपालकांच्या अडचणीत भर पडली आहे.मागील पाच महिन्यांपासून निधी न मिळाल्याने शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेल्या नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम वळती करण्यात आलेली नाही. निधी मिळावा म्हणून संबंधितांकडे दोन वेळा पत्रव्यवहार करण्यात आले आहे. शासनाकडून लवकरच निधी मिळेल, त्यानंतर नुकसानग्रस्तांना निधीचे वितरण करण्यात येईल.- तुषार दमडेरे, सहाय्यक वनसंरक्षक, वर्धा.
वनविभागात नुकसान भरपाईची ३,१९९ प्रकरणे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST
मागील पाच महिन्यांपासून नुकसान भरपाईपोटीचा निधीच उपलब्ध न करून दिल्याने शासकीय मदतीसाठी पात्र ठरलेली तब्बल ३,१९९ प्रकरणे सध्या रखडली आहेत. शासनाकडून निधी मिळावा म्हणून उपवनसंरक्षक कार्यालयाच्यावतीने आतापर्यंत दोन वेळा वरिष्ठांना पत्रव्यवहार करण्यात आला आहे. लवकरच शासकीय मदत मिळेल अशी आशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आहे.
वनविभागात नुकसान भरपाईची ३,१९९ प्रकरणे रखडली
ठळक मुद्देवरिष्ठांना पत्रव्यवहार : पाच महिन्यांपासून छदामही मिळाला नाही