महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे कारवाईवर्धा : शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता समाज विघातक गुन्हे करणाऱ्या पाच जणांना वर्धेतून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ प्रमाणे करण्यात आली. राकेश मुन्ना पांडे (२५), गणेश श्यामराव पेंदोर (२८), दीपक ऊर्फ सोनू विजय वासनिक (२३), अमोल गणेश गेडाम (२४) चौघेही रा. इतवारा बाजार तर सचिन ऊर्फ भुरी श्याम अरखेल (२८) रा. पुलफैल या पाच जणांचा यात समावेश आहे. हद्दपारीची कारवाई करण्यात आलेल्या पाचही जणांवर शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, शस्त्र बाळगणे, खून, खुनाचा प्रयत्न करणे, अपहरण, दहशत पसरविणे, मारपीट करणे यासह अवैध दारू विक्रीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. हद्दपारीची कारवाई झालेले पाचही जण टोळीने गुन्हे करीत असल्याचे समोर आले आहे. या टोळीचा म्होरक्या राकेश पांडे हा होता. गुन्हेगारी टोळीचा बिमोड करणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ प्रमाणे ठाणेदार एम.पी. बुराडे यांनी या पाच जणांवर हद्दपारीचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे सादर केला. एलसीबीने हा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. यावर अधीक्षकांनी आदेश काढून या पाच जणांना दोन वर्षाकरिता वर्धेतून हद्दपार केले. या आदेशाच्या अंमलाकरिता शहर ठाण्याकडून कारवाई करण्यात येणार आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एम. डी. चाटे, शहर ठाण्याचे पोलीस निरीक्षक एम. पी. बुराडे यांनी केली.(प्रतिनिधी)
वर्धेतील पाच जणांना केले दोन वर्षांकरिता हद्दपार
By admin | Updated: March 20, 2016 02:14 IST