वर्धा : जनतेनी ज्यांना निवडून मिनी मंत्रालयात म्हणजेच जिल्हा परिषदेत पाठविले. ही मंडळी आपल्या क्षेत्रातील समस्यांबाबत किती उदासीन आहे याचा प्रत्यय शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आला. ५१ पैकी सुमारे ४० सदस्य सभेला आवर्जून उपस्थित झले. मात्र सभेत मध्यान्ह भोजनाचा आस्वाद घेऊन तब्बल दोन्ही गटातील २३ सदस्यांनी सभेतून बहिर्गमण केले. यामुळे महत्त्वाचे प्रश्न विषयसूचीवरच राहिले. धक्कादायक बाब म्हणजे, स्वत:च्या क्षेत्रातील प्रश्नांचा विसरही या सदस्यांना पडला.दर तीन महिन्यांनी जि.प.ची सर्वसाधारण सभा घेण्यात येते. या सभेला सर्व गटातील जि.प. सदस्यांना आपल्या क्षेत्रातील समस्यांना वाचा फोडून त्या सोडवून घेण्याची नामी संधी मिळते. याच अनुषंगाने ही सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती. या सभेला ५१ पैकी ४० सदस्यच हजर होते. यातही ११ सदस्य आधीच गैरहजर होते. विषयसूचीवर एकूण ५६ विषय होते. यामध्ये सदस्यांनी सुचविलेल्या प्रश्नांचा अधिक समावेश होता. ४० सदस्यांच्या उपस्थितीत अध्यक्ष चित्रा रणनवरे, उपाध्यक्ष विलास कांबळे आणि सचिव राजेंद्र भुयार यांनी सभेला सुरुवात केली. यानंतर सूचीवरील सुमारे २५ विषयांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान विरोधकांनी शिक्षण विभागाला चांगलेच घेरले. दुपारी ४.३० वाजता सदस्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. सर्वच सदस्यांनी यथेच्छ ताव मारला. भोजनासाठी अर्ध्या तासाची वेळ ठेवण्यात आली होती. यानंतर सदस्यांनी पुर्ववत सभागृहात हजर राहणे अपेक्षित होते. मात्र उपस्थितांतील निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे तब्बल २३ सदस्यांनी घरचा रस्ता पकडला. सभागृहात पटलावरील पुढील विषय घेऊन त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी सदस्यांची प्रतीक्षा सुरू झाली. मात्र केवळ १७ सदस्यच उपस्थित होऊ शकले. सदस्य संख्या कमी असल्यामुळे सभा पुढे नेता येत नाही, ही बाब सुनीता ढवळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी सभागृहाच्या नियमावलीचा आधार घेत सभागृहात कमीत कमी २० सदस्य संख्या असेल तर विषय सूचीवरील पुढील विषय चर्चेत घेऊन त्यावर धोरणात्मक निर्णय घेता येते, मात्र सभागृहात हा आकडा जुळत नसल्याची बाब लक्षात येताच सभा तहकूब करावी लागली. ही तहकूब सभा ११ डिसेंबरला घेण्याचे सभागृहात ठरविण्यात आले.(जिल्हा प्रतिनिधी)
जेवणानंतर सदस्यांचे बहिर्गमन
By admin | Updated: December 6, 2014 00:19 IST