सेलगाव(लवणे) : कारंजा तालुक्यातील कार(खैरी) प्रकल्पाच्या जवळ असलेल्या जऊरवाडा, काकडा, परसोडी भागातील केळीच्या पिकांवर बदलत्या वातावरणामुळे करपा रोगाचे सावट पहावयास मिळत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी हवालदिल झाले आहे. येथील शेतकऱ्यांनी धरणातील पाण्याचा उपयोग करीत मोठ्या प्रमाणात केळी बागाची लागवड केली. तीन ते चार वर्षांपासून या गावातील शेतकऱ्यांना केळीपासून उत्पन्न ही मिळाले. परंतु यावर्षी हवामानातील बदलामुळे व गेल्या पंधरा दिवसापासून ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस आणि वातावरणात वाढलेला गारवा यामुळे केळीबागावर करपा रोगाचे सावट तयार झाले आहे. जऊरवाडा येथील अंबादास कुमेरिया, नत्थूसिंग कुमेरिया, पंजाब खरपुरिया, राधेश्याम गुजवार, रामेश्वर कुमेरिया या शेतकऱ्यांनी १ हेक्टर शेतीवर केळीची लागवड केली. यासाठी शेतकऱ्यांना २ ते २.५० लाख रुपये खर्च आला. परंतु बागावर करपा आल्याने केलेला खर्चही निघेल का असा प्रश्न पडला आहे. निसर्गाने शेतकऱ्यांना त्रस्त करून सोडले असताना आता केळी बागांवरही रोगाचे आक्रमण केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. या निसर्गरुपी संकटाने बागायतदारांचे कंबरडे मोडले अशी भावना शेतकरी व्यक्त करीत आहे. प्रशासनाने बागांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)
केळी बागांवर करपा रोगाचे सावट
By admin | Updated: January 6, 2015 23:06 IST