५.६६ लाखांचा मुद्देमाल : पाच जणांविरुद्ध गुन्हा वर्धा : जिल्ह्यात निवडणुकीचा ज्वर चढत आहे. निवडणुकीच्या काळात दारूचा वापर करून मतदान वळविण्याच्या प्रयत्नात असलेल्यांकडून आतापासून दारूचा साठा गोळा करण्याचे काम सुरू आहे. याच कामाकरिता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूसाठा येत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी दोन ठिकाणी कारवाई करून दारूसाठ्यासह एकूण ५ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदर दोन्ही कारवाईदरम्यान पाच जणांविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सुत्रांनुसार, राष्ट्रीय महामार्गावरील वणीमार्गे हिंगणघाट येथे दारू येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून गुरुवारी मध्यरात्री वणी फाट्यावर नाकेबंदी करून एम. एच. ३३ ए. ३४० क्रमांकाची कार अडवून पाहणी केली असता वाहनात दारूसाठा दिसला. या कारवाईत पोलिसांनी दारूची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेली कार व ९१ हजार २०० रुपयांचा दारूसाठा असा २ लाख ४१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर प्रकरणी पोलिसांनी शंकर शिवलाल जयस्वाल, साईनाथ तुलाराम कटारे व अजय शालिक नंदुरकर तिन्ही रा. वडनेर यांच्याविरुद्ध दारूबंदी कलमान्वये हिंगणघाट पोलिसात गुन्हा दाखल करून तिघांनाही अटक केली आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हिंगणघाट पोलीस ठाण्याचे कर्मचारी हमीद शेख, शेखर डोंगरे, रामकिसन ईप्पर आदींनी केली.दुसरी कारवाई समुद्रपूर पोलिसांनी शेडगाव (कुंड) शिवारात केली. पोलिसांनी नागपूरकडुन हिंगणघाटकडे जाणारी एम. एच. १४ ए. टी. ९९९० क्रमांकाची कार नाकेबंदी करीत अडविली. वाहनाची पाहणी केली असता वाहनात मोठ्या प्रमाणात दारूसाठा आढळून आला. या कारवाईत पोलिसांनी वाहनातील दारूसाठा, दारूची वाहतूक करण्यासाठी वापरलेली कार व इतर साहित्य असा एकूण ३.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कारवाई दरम्यान नितेश अशोक पडक्के व अमीत भीमराव झोड यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये समुद्रपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई समुद्रपूर पोलिसांनी केली.(शहर प्रतिनिधी)
निवडणुकीकरिता आलेला दारूसाठा जप्त
By admin | Updated: November 19, 2016 01:05 IST