वर्धा : ‘माझी शाळा स्वच्छ शाळा’ उपक्रमांतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बालकांना स्वच्छतेने महत्त्व कळावे यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्वच्छतेचा संदेश देणारे साहित्य जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्यावतीने शारदा मुकबधीर विद्यालयात हा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. किरण धांदे, शारदा कला व सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्ष उषा फाले, मुख्याध्यापक श्याम भेंडे, मुख्याध्यापक देवेंद्र गाठे यांची उपस्थिती होती. सदर उपक्रमाअंतर्गत बालकांना कंपास पेटी, पेन्सील बॉक्स, चित्रकला वही, नोटबुक कव्हर, स्वच्छ शाळा स्टिकर, स्वच्छता संदेश इत्यादी साहित्य देण्यात आले. बालकांनी यावेळी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. नृत्यविष्काराने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी आपल्या भावना अभिव्यक्त करताना विशेष गरज असणाऱ्या श्रवणऱ्हास बालकांचे बोलके डोळे त्यांच्या मनस्वी हालचाली हातवारे यांच्यासोबत झालेला संवाद आनंददायी ठरला, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या आयोजनात विषय साधनव्यक्ती मनीष जगताप, युवराज वंजारी, शारदा मुकबधीर विद्यालयाचे शिक्षक मंजुषा कदम, ज्योती लोखंडे, अतुल ताकसांडे, शिक्षकेत्तर कर्मचारी गोपाल कामडी, कविता बांगडे, यांनी सहकार्य केले. उपस्थित विद्यार्थ्यांनीही यावेळी कार्यक्रम सादर केले.(प्रतिनिधी)
‘माझी शाळा स्वच्छ शाळा’ उपक्रमात साहित्य वितरण
By admin | Updated: October 14, 2016 02:46 IST