झाडे वाळताहेत : उपाययोजना गरजेच्यासेवाग्राम : पर्यावरण शुद्ध करणाऱ्या आणि प्राणवायू देणाऱ्या कडूलिंबाच्या झाडांवर सध्या वाळवीचे संकट निर्माण झाले आहे. यात मोठ्या प्रमाणात झाडे वाळण्याच्या मार्गावर असल्याचे दिसते. संबंधितांनी याकडे लक्ष देत ही झाडे वाचविणे गरजेचे झाले आहे.सेवाग्राम ते वर्धा व सेवाग्राम-हमदापूर या रस्त्यांच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कडूलिंबाची झाडे आहेत. या झाडांना सध्या वाळवीने ग्रासल्याचे दिसून येते. बुध्यांपासूनच वाळवीने आक्रमण केले असून ती सुमारे सात ते आठ फुटापर्यंत पोहोचल्याचे दिसून येते. गत अनेक दशकांपासून ही झाडे वाटसरूंसाठी आश्रयस्थान होती. उन्ह, वारा, पावसापासून या झाडांनी संरक्षण दिले. शासन वा अन्य कुणी ही झाडे लावली असली तरी त्याचा लाभ अनेक अर्थाने नागरिकांना होत आहे. कडूलिंब अस्सल देशी असून आयुर्वेदात त्याची गणती व महत्त्व आहे. पारंपरिक पद्धतीने उपचार, सण, आरोग्य यात पाला, साल, काड्या, निंबोळ्या आदींचा उपयोग केला जातो. पर्यावरणाला व मानवासाठी उपयुक्त असे हे झाड असून मानवाच्या हव्यासापोटी नामशेष होत आहे. या झाडांची लागवडही होताना दिसत नाही. हे संकट कडूलिंबासाठी धोक्याचे ठरत असून संबंधितांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे.(वार्ताहर)
कडूलिंबावर वाळवीचे संकट
By admin | Updated: February 5, 2016 01:43 IST