वर्धा : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांकरिता झालेल्या मतदानाची सोमवारी मोजणी झाली. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीने बाजार समितीवर असलेली सत्ता राखली. या युतीने १२ जागांवर विजय मिळविला. मुख्य प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपाला मात्र तीन जागांवरच समाधान मानावे लागले. तर तीन जागा अपक्षांनी बळकावल्या.जिल्ह्याचे सहकार नेते व माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख तसेच आ. रणजित कांबळे यांच्या नेतृत्वात राकाँ-काँग्रेसने ही निवडणूक लढली. यात सेवा सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण गटात युतीचे पांडुरंग श्यामराव देशमुख यांनी २२९, श्याम भीमराव कार्लेकर २१७, मुकेश विनायक अळसपुरे, २१३, शरद बापुराव देशमुख २११, रमेश विठ्ठल खंडागळे २०८ तर कमलाकर विठोबा शेंडे १९८ मते घेत विजयी झाले. या गटातील एक जागा भाजपचे दत्ता भगवान महाजन यांनी २०२ मते पटकाविली. याच गटातील महिला राखीव गटातून युतीच्या वैशाली अनिल उमाटे २०३ तर भाजपच्या अपर्णा विलास मेघे यांनी २०५ मते घेत विजयी झाल्या. इतर मागासवर्गीय गटातून भाजपचे पवन सुरेश गोडे यांनी २०७ मते घेत विजय मिळविला. विमुक्त जाती, भटक्या जमाती गटातून राकॉ-काँग्रेस युतीचे सुरेश रामसिंग मेहर यांनी १९८ मते घेत विजय मिळविला. ग्रामपंचायत गटातील निवडणुकीत राकॉ-काँग्रेस युतीचे जगदीश मनोहर मस्के ३०८ व भुषण पद्माकर झाडे २८७ मते घेत विजयी झाले. याच गटातील अनुसूचति जाती जमाती गटातही युतीचे प्रकाश सेवकदास पाटील यांनी ३४२ मते घेत विजय संपादीत केला. आर्थिक दुर्बल घटक गटातून या युतीचे दिनेश कृष्णराव गायकवाड यांनी ३३८ मते घेत विजय मिळविला. व्यापारी अडते गटातील दोन्ही जागा अपक्षांनी बळकाविल्या. यात विजय गजानन बंडेवार यांनी १५२ तर अरविंद बापुराव भुसारी यांनी १४१ मते घेत विजय संपादीत केला. हमाल मापारी गटात शदर देवराव झोड यांनी २७ मते घेत विजय मिळविल्याचे जाहीर करण्यात आले. मतमोजणीनंतर विजयी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी समीर देशमुख उपस्थित होते.(प्रतिनिधी)सेवा सहकारी संस्थेच्या दोन जागांकरिता पुनर्रमोजणी वर्धा बाजार समितीची निवडणूक अटीतटीची होईल, असे भाकीत करण्यात आले होते. याचा अनुभव दोन जागांकरिता झालेल्या पुनर्रमोजणीवरून दिसून आले. सर्वसाधारण गटात नरेंद्र पहाडे आणि दत्ता महाजन या दोघांच्या मतात विशेष फरक नसल्याने पुनर्रमोजणीची मागणी करण्यात आली. यात दत्ता महाजन विजयी झाले. याच गटातील महिला राखीव गटातही मागणीवरुन पुनर्रमोजणी करण्यात आली. यात रत्ना हिवंज व वैशाली उमाटे यांच्यात असलेल्या अत्यल्प मतफरकामुळे ही मोजणी करण्यात आली. यामध्ये वैशाली उमाटे विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले.
वर्धा बाजार समितीवरही काँग्रेस-राकॉचा झेंडा
By admin | Updated: July 14, 2015 02:32 IST