अजित कडकडे : मुलाखतीतून उलगडला प्रवासहिंगणघाट : अध्यात्म हे गाण्यातून दिसते. संतांचे बोल हे सर्व भक्तांपर्यंत पोहोचवितो, तो स्वधर्म होय. याच भावनेतून मी स्वरांच्या माध्यमातून पोहोचवून ईश्वरसेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे. अभिजात संगीत हे प्राचीन असून आमच्या संस्कृतीचे धरोहर आहे. यामुळे काळाच्या ओघात ते कधीच नष्ट होणार नाही, असा आशावाद सुप्रसिद्ध गायक पं. अजित कडकडे यांनी व्यक्त केला. एका कार्यक्रमानिमित्त येथे आले असता ते चर्चा करीत होते. अध्यात्म क्षेत्राकडे कसे वळलात, याबाबत बोलताना ते म्हणाले, अध्यात्माची माझ्या घरी कोणती परंपरा नव्हती; पण वयाच्या सातव्या वर्षी नरसोबाच्या वाडीला दर्शनाला गेलो असता नदीच्या पात्रात वाहत गेलो. बेशुद्ध अवस्थेत मला बाहेर काढले. माझा तो पुनर्जन्म होता. दत्तप्रभुच्या कृपेने मला नवीन जीवन मिळाले. त्यानंतर २० वर्षे मी नरसोबाच्या वाडीला गेलो नाही; पण ज्यावेळी गेलो त्यावेळी दत्तप्रभूची पूर्ण कृपा माझ्यावर झाली. त्या अनामिक शक्तीने मी अध्यात्माकडे वळलो. भक्तिगीताच्या माध्यमातून केलेला स्वरांचा रियाज हा ईश्वरापर्यंत पोहचण्याचा मार्ग आहे. प्रत्येकाच्या हृदयात ईश्वर आहे. त्याच्याच आशीर्वादाने मी ३५ वर्षांपासून या संगीत क्षेत्रात वावरत आहे. जनतेचे प्रचंड प्रेम मला मिळत गेले. देश -विदेशात मी आजवर अनेक कार्यक्रम घेतले व श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रत्येक व्यक्तीने आंतरिक अनुसंधान जपले पाहिजे. जग जेवढे पैशाच्या मागे धावत आहे, तेवढे अनुसंधान कमी होत आहे. धावपळीच्या युगात अनुसंधानासाठी वेळ नाही. यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहे. आज अभिरूचिहीन गाणी येत आहे. त्यामुळे अभिजात संगीताला धोका निर्माण होऊ शकतो काय, यावर लाटा या क्षणिक असतात. त्यामुळे महासागराचे नुकसान होत नाही. दर पाच वर्षांनी नवीन फॅशन येते व जुनी कालबाह्य होते. आजही शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी तरूण पिढी पुढे येत आहे, ही समाधानाची बाब आहे. टीव्ही चॅनलेवरील ‘रिअॅलिटी शो’मुळे युवक-युवतींना प्लॅटफार्म मिळत आहे. यातील नौटंकी टीआरपीसाठी असते, तरी प्रतिभांना जन्म मिळाला, हे वास्तव असल्याचेही कडकडे म्हणाले.(तालुका प्रतिनिधी)
अभिजात संगीत हे प्राचीन असून संस्कृतीचे धरोहर
By admin | Updated: February 8, 2016 02:19 IST