शेतकऱ्यांच्या समस्यांकडे होतेय दुर्लक्षआर्वी : प्रशासकीय सेवेत महसूल विभाग हा महत्त्वाचा घटक आहे. शासन व्यवस्था व नागरिक यांच्यातील विकासाचा दुवा म्हणून तो ओळखला जातो; पण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या ढिसाळ व अनागोंदी कारभारामुळे परिसरातील नागरिकांच्या समस्या व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्याऐवजी त्यात भर पडत असल्याचे दिसते. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतर करणारी अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. यात कारंजा तालुक्यातील २५ व आष्टी तालुक्यातील २६ प्रकरणांचा समावेश आहे. सोबतच जातीची प्रमाणपत्रे व उन्नत तथा प्रगत गटात मोडणारे नॉन क्रिमीलेयरचीही प्रकरणे विभागाच्या उदासिन धोरणामुळे प्रलंबित आहेत. परिणामी, आर्वी तालुक्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांची परवड होत आहे. आर्वी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचा कारभार रामभरोसे व कासवगतीने सुरू आहे. सदर विभागातील १८४ महसूल प्रकरणे कार्यवाहीस्तव सादर आहे. नवीन व जुने, असे २६१ प्रकरणे एसडीओ कार्यालयाच्या दुर्लक्षामुळे खितपत आहेत. यामुळे हा विभाग दलालांच्या मगर मिठीत असल्याची चर्चा आहे. यात कर्मचाऱ्यांचे चांगभले होत असले तरी सामान्यांना न्यायासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे दिसते. शासन जनतेच्या सेवेसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देत असताना येथे त्या सुविधांचा फज्जा उडत असल्याचे दिसते. एसडीओ कार्यालयात सामान्य नागरिकांना दररोज विविध कामांसाठी चकरा माराव्या लागतात; पण कामेच होत नसल्याने ते त्रस्त झाले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)
आर्वी उपविभागीय कार्यालयाचा अनागोंदी कारभार
By admin | Updated: February 2, 2016 02:01 IST