अधिकाऱ्यांची मूकसंमती : कारवाईसाठी प्रशासनाला साकडेवर्धा : असंघटित कामगारांची नोंदणी करण्याचे काम सुरू आहे. यात बांधकाम कामगारांचे अर्ज स्वीकारले जात आहेत. हे अर्ज स्वीकारताना भेदभाव केला जात असून दलालांना प्राधान्य दिले जात असल्याचे दिसते. हा प्रकार त्वरित बंद करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी बांधकाम कामगारांनी केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आले आहे. जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात इमारत व बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे काम सुरू आहे. शिवाय त्यांच्यासाठी असलेल्या योजनांचे अर्ज स्वीकारले जात आहे; पण या कार्यालयातील कर्मचारी अनधिकृत दलालांमार्फत आलेले अर्ज स्वीकारत आहेत. प्रत्यक्ष अर्ज घेऊन जाणाऱ्या खऱ्या लाभार्थ्यांना योजनांची माहिती दिली जात नाही. शिवाय अर्जही दिला जात नाही. कामगारांना अभद्र वागणूक दिली जाते. यामुळे बांधकाम क्षेत्रातील बहुतांश लाभार्थी त्यांना मिळणाऱ्या योजनांपासून वंचित राहत असल्याचे दिसते. दलालांमार्फत अर्ज देणाऱ्या लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असल्याचेही दिसून येत आहे. ही फसवणूक, कार्यालयातील गैरव्यवहार थांबविण्याकरिता चौकशी करून अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे. जिल्हा कामगार कार्यालयात चालणाऱ्या या प्रकारांबाबत यापूर्वीही निवेदन देण्याात आले; पण त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. आता कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही कामगारांनी निवेदनातून दिला.(कार्यालय प्रतिनिधी)
कामगार कार्यालयालाही दलालांचा विळखा
By admin | Updated: February 5, 2016 01:42 IST