वर्धा : समुद्रपूर येथील तहसील कार्यालयात दलालांचा सुळसुळाट आहे. या दलालांमुळे सामान्यांची कामे खोळंबली आहे. कोणतेही प्रमाणपत्र, दाखल्यासाठी दलालांच्या माध्यमातून कामे करावी लागतात. यातही पुरवठा विभागातील अनेक पदे रिक्त असल्याने अनधिकृतरित्या कामे केली जातात. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देत अधिकृत कर्मचारी नियुक्त करून दलाल हद्दपार करावेत, अशी मागणी होत आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांना देण्यात आले आहे. तालुक्यातील नागरिकांनी सुरेंद्र गवळी यांच्या नेतृत्त्वात हे निवेदन सादर केले. या निवेदनानुसार, समुद्रपूर तहसील कार्यालयातील अन्न व पुरवठा विभागाला गत ५ ते ६ वर्षापासून दलालांचा विळखा पडला आहे. रेशन कार्ड डुप्लीकेट काढणे, यादीतील नावे बाद करणे, कार्डातील नावे गहाळ करणे आदी प्रक्रार सुरू आहे. शिवाय प्रमाणपत्र बनविणे व इत्यादी कामाकरिता ग्राहकांना ५00 ते १000 रुपये मोजावे लागतात. याची संबंधित अधिकारी यांना कल्पना असून देखील याप्रक्राराकडे डोळेझाक केली जात आहे. यामुळे ग्राहकांची मात्र प्रचंड लूट होत आहे. रेशन कार्डाकरिता अनेक महिने प्रतीक्षा करावी लागते. यामुळे तालुक्यातील अनेक नागरिकांची प्रमाणपत्राची कामे प्रलंबित आहे. यातही जे लोक दलालांना पैसे देतात त्यांची कामे त्वरीत पूर्ण होतात. ही वस्तुस्थिती बदलण्याची गरज आहे. यातून होत असलेल्या आर्थिक व्यवहारात साटेतोटे आहे का, असाही प्रश्न विचारला जातो. या निवेदनाची प्रत तहसीलदार समुद्रपूर यांना दिली आहे. या निवेदनाकडे गांभिर्याने लक्ष देत कर्मचारी नियुक्त करण्यात यावे. तसेच नागरिकांची लूट थांबवावी, अशी मागणी केली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)
दलालांमार्फत तयार केल्या जातात बोगस शिधापत्रिका
By admin | Updated: May 25, 2014 23:48 IST