विश्वजीत कदम : प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीने संविधान संरक्षण ज्योत यात्रापुलगाव : देशात व राज्यात असणारे भाजप सरकार अन्यायी व अत्याचारी सरकार आहे. सत्तेवर आल्यापासून देशात जाती-जातीत, धर्मा-धर्मांत मतभेद निर्माण करीत आहे. ज्या विचारांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली, त्या घटनेची, संविधानाची सरकारकडून पायमल्ली होत आहे. देशातील दलित व गरिबांच्या संरक्षणासाठी युवक काँग्रेस भाजपा सरकारला संविधानावर हल्ला करू देणार नाही, असा इशारा युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी दिला.भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश युवक काँग्रेसद्वारे सेवाग्राम येथून काढण्यात आलेली संविधान संरक्षण ज्योत यात्रा शुक्रवारी रात्री येथे पोहोचली. यावेळी नगर परिषद पुढील प्रांगणात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तत्पूर्वी कदम यांनी डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले.राष्ट्रपिता महात्मा गांधी ते घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारा व तत्वप्रणालीवर चालणारा काँग्रेस पक्ष आहे. भाजपा सरकारकडून होणारी संविधानाची पायमल्ली थांबविण्याची ताकद केवळ काँग्रेस पक्षातच आहे, असे मतही कदम यांनी यावेळी व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मनीषकुमार साहू तर अतिथी म्हणून काँग्रेस शहर अध्यक्ष रमेश सावरकर, प्रभारी हिंमत असंग, सहप्रभारी हरिकिशन पुजाला, रित्वीज, निलेश विश्वकर्मा, जोशी, वर्धा लोकसभा मतदार संघाचे अध्यक्ष विक्रम ठाकरे, देवळी पुलगाव मतदार संघाचे अध्यक्ष विपीन राऊत, मनोज वसू, महेश तेलरांधे, युवक काँगे्रसचे गोविंद दैय्या प्रामुख्याने उपस्थित होते.शिवाय महिला काँग्रेस शहराध्यक्ष रंजना पवार, सरपंच वहिदा शेख, मृणाल सोनी, प्रमोद घालणी, सुमंत मानकर, विलास कडू, शैला शरीफ, नगरसेविका मंगला अंबादे, रमेश शर्मा, राजू गिरूळकर, संजय दाबोडे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अश्विन शाह यांनी केले तर उपस्थितांचे आभार विठ्ठल वानखेडे यांनी मानले. याप्रसंगी संविधान संरक्षण ज्योत यात्रेबाबत माहिती देण्यात आली.(तालुका प्रतिनिधी)
भाजप सरकारला संविधानावर हल्ला करू देणार नाही
By admin | Updated: April 10, 2016 02:27 IST