सेलू - दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस व मंगळवारी रात्री सुरू झालेला सोसाट्याचा वारा यामुळे रेहकी, सुरगाव, कामठी, वडगाव कला, वडगाव खुर्द, मोही, हिंगणी व झडशी परिसरातील केळी बागांचे मोठे नुकसान झाले. या भागातील शेतकरी केळी हे नगदी पीक म्हणून आवर्जून घेतात. ऊन्ह, वारा व पावसापासून जोपासना करीत हाता-तोंडांशी आलेला घास ऐनवेळी वारा व पावसाने हिरावला. यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाच्या मदतीची गरज असताना गतवर्षीच्याच नुकसानीची अद्याप मदत मिळाली नाही. यंदाही तेच संकट उभे ठाकल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोमवारी रात्री सुरू झालेला पाऊस मंगळवारी दिवसभर होता. मंगळवारी रात्री १० नंतर जोरदार वाऱ्यामुळे केळीची झाडे जमिनदोस्त झाले. रेहकी येथील शेतकरी नत्थूजी कलवडे यांची २६०० पैकी सुमारे २००० तर बबन झाडे यांच्या ३००० पैकी २००० केळीची झाडे उन्मळून पडली. आहेत. शिवाय अशोक झाडे, अरुण सावरकर, बाबाराव धानकुटे, नरेश चंदनखेडे, वडगाव येथील बाबाराव बोबडे, पुरूषोत्तम बोबडे, नाना शेंडे, पुंडलिक पारसे, मोही येथील चंद्रशेखर धोटे, गणेश मुडे, कांबळे, भोयर यांच्या केळी बागाचे नुकसान झाले.
संततधार पावसामुळे केळी बागा कोलमडल्या
By admin | Updated: August 6, 2015 00:31 IST