लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : नगरपंचायतचा कारभार म्हणजे 'नाचता येईना अंगण वाकडे' असाच झाला आहे. नगरपंचायतच्या खात्यात पैसे नाहीत. मात्र, विविध बाबींवर करण्यात येणाऱ्या खर्चापोटी धनादेश दिले जात आहेत. ते धनादेश बैंकेतून वटले जात नाहीत. त्यामुळे नगरपंचायत आर्थिक डबघाईस आल्याने नगरपंचायतला कधीही उधारीवर साहित्य द्यायला तयार नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
आष्टी नगरपंचायतच्या हद्दीमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात विविध करापोटी वसुली केली जाते. ज्या सुविधा नगरपंचायत देत नाही त्याचाही कर जबरदस्तीने वसूल केला जात आहे. आष्टी शहरात प्रचंड अतिक्रमण वाढले, ते अतिक्रमण काढण्यास नगरपंचायत असमर्थ ठरली आहे. विकासाचे कुठलेही काम होताना दिसत नाही. थोडेफार शासनाकडून काम मंजूर झाले. त्यातही ५६ लाखांच्या निविदा मॅनेज झाल्याचा आरोप खुद्द सत्ताधारी नगरपंचायतच्या उपाध्यक्षांनीच केल्यामुळे न्याय मागायचा कुणाकडे, हा प्रश्नसुद्धा उपस्थित झाला आहे. नगरपंचायतकडून कुठल्याच सोयी-सुविधा नागरिकांना मिळत नाहीत.
अनेक प्रभागांमध्ये लाइट बंद आहे. नाल्या भरलेल्या असून साथीचे आजार झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे साहित्य खरेदी, विहिरीमध्ये ब्लिचिंग पावडर टाकणे हे काम गेल्या अनेक महिन्यांपासून ठप्प आहे. नगरपंचायतकडे निधी नसल्यामुळे कोणीही उधारीत साहित्य देण्यास तयार नाही. त्यातच नगरपंचायतचे लेखापाल, नवीन आलेले मुख्याधिकारी यांना पहिलीच वेळ असल्यामुळे पाहिजे तसे प्रशासन चालविण्याचे कौशल्य दिसत नाही. त्यामुळे दररोज काही ना काही उलथापालथीच्या घडामोडी सुरू आहेत.
धनादेश लिहितानाही चुकांचा भडिमारलेखापाल हे धनादेश लिहिताना कधी इंग्रजी तर कधी मराठी या दोन्ही भाषांचा वापर करून त्रोटक पद्धतीने धनादेश तयार करतात आणि खात्यामध्ये पैसेसुद्धा राहत नाहीत. हे धनादेश बैंकेत टाकल्यावर ते वटतच नाहीत. त्यानंतर संबंधित खरेदीदार नगरपंचायतला विचारणा करतात. लेखापाल त्यांना उडवाउडवीची उत्तरे देतो. अशा भोंगळ कारभाराची दखल घेत अधिकाऱ्यांवर वरिष्ठांनी तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे. मुख्याधिकारीही पाहतो, बघतो अशी भाषा वापरून वेळ मारून नेत असल्याने रोष व्यक्त होत आहे.
सत्तारुढ होण्यासाठी पाठिंबा देणारे सत्तेतून पडले बाहेरकाँग्रेस आणि जनशक्ती संघटनेने मिळून ही नगरपंचायत सत्तारूढ झाली होती. मात्र गेल्या काही महिन्यांआधी जनशक्ती संघटनेने आपला पाठिंबा काढून घेतला. त्यांनी असा आरोप केला की, नगरपंचायत आष्टी हे जनतेचे विकासकाम करण्यात असमर्थ ठरली आहे. त्यातच आता नगरपंचायतजवळ पैसे नसल्यामुळे संपूर्णपणे आर्थिक डबघाईस आलेली नगरपंचायत असे चित्र पाहायला मिळत आहे.
आर्थिक स्थिती नाजूक, मिळणाऱ्या निधीवर काम "नगरपंचायत आष्टीची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. मालमत्ता आणि पाणीपट्टी करापोटी तसेच विविध करांपोटी जेवढी वसुली होईल, तेवढ्यावर भागविणे सुरू आहे. मागणी केल्याप्रमाणे धनादेश दिला जातो. खात्यात पैसे कमी असल्यामुळे धनादेश वटला नाही तर खात्यामध्ये पैसे टाकून पुन्हा दुसरा धनादेश द्यायला सांगतो."- अक्षय गडलिंग, मुख्याधिकारी, नगरपंचायत आष्टी (शहीद).