आर्वी : येथून देऊरवाडा मार्गाने अमरावतीकडे काही मंडळी बैलाचा कळप घेऊन जात होती. बैल कत्तलखान्याकडे नेत असावे, असा संशय घेत तो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अडविला. यावरून दोन्ही गटात हाणामारी झाली. पोलीसही घटनास्थळी धावून गेले. ते साध्या वेशात असल्याने त्यांनाही धक्काबुक्कीचा सामना करावा लागला. यात बजरंग दलाचे पाच कार्यकर्ते जखमी झाले. ही घटना मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने बुधवारी आर्वीत काही काळ तणावाचे वातावरण होते. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणाऱ्या ३४ जणांविरुद्ध भादंविच्या कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०४, २९४ व ५०६ अन्वये गुन्हे दाखल केले़ यातील ९ जणांना अटक केली असून २५ जणांचा शोध सुरू आहे़तणावाची स्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून शहरात सुमारे १०० पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. तसेच काही ठिकाणी नाकाबंदीदेखील करण्यात आली. पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी बुधवारी आर्वी गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. प्राप्त माहितीनुसार, आर्वी-देऊरवाडा मार्गावर जनावरांची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली आणि कार्यकर्ते घटनास्थळी रवाना झाले. तेथे उपस्थित असलेल्या १८ ते २० जणांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. मारहाणीत जखमी झालेल्या बजरंग दलाच्या पाच कार्यकर्त्यांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार शैलेश साळवी यांच्यासह साध्या वेशातील पोलीस घटनास्थळी रवाना झाले; पण पोलिसांनाही धक्काबुक्की झाली. पोलीस असल्याचे कळताच मारहाण करणारे घटनास्थळावरून पळून गेले. घटनेत वापरलेल्या लाठ्याकाठ्या पोलिसांनी जप्त केल्या. दरम्यान, अनुप जैस्वाल व बजरंग दल गौरक्षण व हिंदू परिषदेच्या ५० वर कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांची भेट घेत आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लावून धरली़(तालुका प्रतिनिधी)
जनावरे अडविल्याने आर्वीत तणाव
By admin | Updated: December 18, 2014 02:02 IST