वर्धा : जिल्हा परिषदेच्या कोल्ही येथील शाळेतील उपक्रमशिल शिक्षकाने राबविलेल्या डिजिटल टॅब अद्यापन पद्धतीने ग्रामीण भागातील विद्यार्थीही शहरी भागापेक्षा कमी नसल्याचे दाखवून दिले. या पद्धतीची माहिती घेण्याकरिता जिल्हाधिकारी आशुतोष सलील आणि मुख्यकार्यपालन संजय मिना, शिक्षण सभापती मिलिंद भेंंडे शुक्रवारी या शाळेत पोहोचले. उपक्रमाची माहिती घेताना जिल्हाधिकारी, सीईओ व सभापती विद्यार्थी तर विद्यार्थी येथे शिक्षक झाल्याचे दिसून आले. इंग्रजी शाळेतील शाळेतील शिक्षणाची सर्वत्र चर्चा होत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांवर अवकळा आल्याचे दिसते. असे असताना जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक खरचं उपक्रमशिल असल्याचे समोर आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता या शिक्षकांकडून अनेक उपक्रम राबविल्या जात आहेत. याच प्रकारातून हिंगणघाट पंचायत समितींतर्गत दुर्गम भागात असलेल्या कोल्ही जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापक अनिल नाईक यांनी शाळेत डिजिटल टॅब अध्यापन पद्धती अस्तित्त्वात आणली. या पद्धतीने उत्तम प्रकार अध्यापन करता येत असल्याचे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या या उपक्रमाची माहिती घेण्याकरिता जिल्हाधिकारी आशुतोष सलील या शाळेत पोहोचले. यावेळी डायटच्या प्राचार्य किरण धांदे, गटशिक्षणाधिकारी पेंदामकर, देशपांडे व केंद्र प्रमुख विजया ढगे यांच्यासह गावकरी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी शाळेत पोहोचताच आवाराची पाहणी केली. शाळेच्या शिक्षकांनी निर्माण केलेल्या वातावरणाने ते चांगलेच भारावले. यावेळी सोबत असलेले सीईओ मीना व शिक्षण सभापती भेंडे यांनी त्यांना शाळेत राबविल्या जात असलेल्या उपक्रमांची माहिती देत शिक्षकांचे कौतुक केले.अतिदुर्गम भागात असलेल्या या शाळेत शिक्षक नाईक यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाची माहिती घेण्याकरिता जिल्हाधिकारी आले असता त्यांना शिक्षकांनी नाही तर विद्यार्थ्यांनी त्याची माहिती दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडून टॅब हाताळण्याची माहिती घेताना जिल्हाधिकारीही अवाक् झाले. या विद्यार्थ्यांनी टॅबच्या माध्यमातून कशा प्रकारे अध्यापन होते याची दिली. ही माहिती घेताना जिल्हाधिकारी, सीईओ व शिक्षण सभापती विद्यार्थी झाल्याचे दिसून आले. त्यांनीही विद्यार्थ्यांकडून माहिती घेताना आपण स्वत: विद्यार्थी असल्याचे मान्य केले. या नंतर शाळेत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची माहिती शिक्षक नाईक यांनी जिल्हाधिकारी व सीईओ यांना दिली. त्यांनी शाळेत विद्यार्थ्यांकडून नित्याने राबविल्या जात असलेले उपक्रम यावेळी सांगितले.(प्रतिनिधी) विद्यार्थ्यांनी विचारले जिल्हाधिकाऱ्यांना नाव ४टॅब अध्यापन पद्धतीची माहिती घेण्याकरिता जिल्हाधिकारी यांच्यासह सीईओ व शिक्षण सभापती शाळेत पोहोचले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या अध्यापन पद्धतीची माहिती जाणून घेण्याकरिता विद्यार्थ्यांशी संपर्क केला असता त्यांनी प्रथम त्यांना तुमचे नाव काय असे विचारले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आपण विद्यार्थी झाल्याचा अनुभव आला. माहिती घेण्याकरिता आमच्या बाजुला बसा असे म्हणत जिल्हाधिकारी सीईओंना आपल्या बाजूला बसविले. यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांना माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांना पाहून गावकरी हरकले ४जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कोल्ही या गावात आतापर्यंत कधीही जिल्हाधिकारी पोहोचले नसल्याचा इतिहास आहे. या गावात पोहोचणारे आशुतोष सलील हे पहिले जिल्हाधिकारी ठरले. जि.प.शाळेतील शिक्षकाने राबविलेल्या उपक्रमाची माहिती घेण्याकरिता जिल्हाधिकारी पोहोचल्याने शिक्षकांकडून या पद्धतीचे उपक्रम राबविण्यास उर्जा मिळेल अशा प्रतिक्रीया मिळत आहेत. नावीन्यपूर्ण योजनेतून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना ४जिल्हा परिषदेच्या कोल्ही शाळेत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची माहिती घेतना जिल्हाधिकारी चांगलेच भारावले. त्यांनी ज्या शाहेत इ-लर्निंगची सुविधा आहे त्या शाळेत हा उपक्रम राबविण्याच्या सूचना केल्या. याकरिता नावीन्यपूर्ण योजनेतून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्याची माहिती शिक्षण सभापती भेंडे यांनी दिली. जिल्ह्यात इ-लर्निंची सोय असलेल्या एकूण ४०२ शाळा आहेत. जिल्हाधिकारी यांच्या सूचनेतून या सर्व शाळांना ही सुविधा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
अन् जिल्हाधिकारी, सीईओ झाले विद्यार्थी
By admin | Updated: January 2, 2016 08:35 IST