लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : करोनाच्या टाळेबंदीच्या काळात वर्धा जिल्ह्यातील महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी मास्क शिवून त्यातून २५ लाखांची उलाढाल केल्याची माहिती मिळाली आहे. जिल्ह्यातील १८१ बचतगटांच्या १ हजार ६५४ महिलांनी मिळून १ लाख ३२ हजार २२९ मास्क तयार करीत २५ लाख ७९ हजार ७३० रूपयांची उलाढाल केली. रोख नफा ११ लाख रुपये पदरात पडला. या काळात व्यावसायिक क्षेत्रात सर्वात मोठी ही उलाढाल ठरली. करोनाचे संक्रमण वाढू लागल्यावर मास्क अनिवार्य ठरले. सर्वत्र तुटवडा जाणवायला लागला. आवश्यक असणाऱ्या आरोग्य यंत्रणेस मास्कची चणचण जाणवायला लागल्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे व ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजीत बडे यांना जिल्ह्यातील बचतगटांची आठवण झाली. बचत गटाच्या पदाधिकाºयाशी चर्चा झाल्यावर महिलांनी आव्हान स्वीकारले. प्रामुख्याने ग्रामीण भागात कार्यरत गटातील महिला वेगवेगळ्या व्यवसायात कार्यरत आहेत. मास्क तयार करण्याचा अनुभव अनेकांना नव्हता. पण टाळेबंदीमुळे घरातील पुरूषांचा रोजगार संपलेला व बचतगटाचे कामही ठप्प पडले असल्याने महिलांनी मास्क तयार करण्याचे तंत्र शिकून घेत शिवणयंत्रही शोधली. दिवसातील दहा तास शिवणयंत्र घरघरू लागली.आठही तालुक्यातील बचतगटांनी लागेल तसा पुरवठा सुरू केला. कापडाची दुकाने बंद असल्याने हे काम ठप्प पडत असण्याची स्थिती आल्यावर वर्धा शहर कपडा लाईन संघटनेने तत्परतेने माफक दरात पाहिजे तेवढे कापड उपलब्ध करून दिल्याची माहिती उमेद अभियानाच्या व्यवस्थापक स्वाती वानखेडे यांनी दिली. आरोग्य खात्याचे विविध विभाग, पंचायत समिती, नगर परिषद, ग्रामपंचायत तसेच स्वयंसेवी संस्थांना पुरवठा करण्यात आला.वीस ते पंचवीस रुपये दराने उत्पादन खर्चावर आधारित विक्री झाल्याचे विपणन व्यवस्थापक मनिष कावडे यांनी सांगितले. करोनाच्या संकटात हातपाय गळून बसलेल्या अनेक गावात या गटांनी ऊर्जा आणली. जिल्ह्यातील बचतगट अनेक बाबतीत राज्यात आघाडीवर राहिले आहे. मास्कच्या व्यवसायातसुध्दा महिलांनी चांगली कामगिरी बजावल्याचे वानखेडे यांनी सांगितले. लॉकडाऊन काळात संपूर्ण कुटूंब घरातच बसून होते. घर कसे चालणार ही चिंता असतांनाच मास्कचा व्यवसाय हाती आल्याने प्रश्न मिटला. प्रत्येकीला तीनशे रुपये रोज पडला. सरकारची गरजही भागली. व आम्हीही सावरलो, अशी भावना जीवन्नोनती महिला बचतगटाच्या अध्यक्ष संगिता गायकवाड यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात महिला बचत गटाने पापड, लोणचे आदी पदार्थ तयार करून ते मोठ्या कार्पोरेट कंपन्याच्या थाटात विकले. त्यातून आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग त्यांनी शोधला.
लॉकडाऊनमध्ये केली २५ लाखांची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 05:00 IST
जिल्ह्यातील १८१ बचतगटांच्या १ हजार ६५४ महिलांनी मिळून १ लाख ३२ हजार २२९ मास्क तयार करीत २५ लाख ७९ हजार ७३० रूपयांची उलाढाल केली. रोख नफा ११ लाख रुपये पदरात पडला. या काळात व्यावसायिक क्षेत्रात सर्वात मोठी ही उलाढाल ठरली. करोनाचे संक्रमण वाढू लागल्यावर मास्क अनिवार्य ठरले.
लॉकडाऊनमध्ये केली २५ लाखांची उलाढाल
ठळक मुद्देजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचा पुढाकार : आठ तालुक्यातील महिला बचत गटांना मिळाला दिलासा