आर्वी बाजार समितीत ३१०० रुपयांचा दर आर्वी : येथील बाजार समितीत सोयाबीन खरेदी सुरू झाली. यावेळी बाजारात खरेदीच्या प्रारंभीच १०१ पोते सोयाबीनची आवक झाली. मुहूर्ताच्या वेळी सोयाबीनला ३१ रुपयांचा दर देण्यात आला. शेतकऱ्यांच्या शेतातून सोयाबीन निघणे सुरू झाल्याने शेतकऱ्यांची बाजारात गर्दी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. आर्वी बाजार समिती मार्केट यार्डवर शुक्रवारला धान्य मार्केटचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी १०१ पोते सोयाबीनची आवक होती. सरासरी बाजारभाव ३०२१ ते ३१६१ रुपयापर्यंत राहिले. सोयाबीन खरेदीचा पहिला मान जळगाव येथील शेतकरी रमेश दारोकार यांना मिळाला. त्यांनी १३ पोते सोयाबीन आणले. राजन खारकर यांच्या अडतमधील मालाला व्यापारी शालीमार (अजय अग्रवाल) यांनी ३ हजार १२१ रुपये प्रती क्विंटल प्रमाणे भाव दिला. या प्रसंगी शेतकऱ्यांना टोपी, दुप्पटा व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अडते, व्यापारी व हमाल यांना सुद्धा सन्मानित करून काट्याचे पूजन झाले. यावेळी समितीचे माजी संचालक महादेव भाकरे तसेच समितीचे सचिव पंजाब राठोड, कर्मचारी वृंद विनोद कोटेवार, मारोतराव वावरे, राजेंद्र घोडमारे, देवेंद्र हिवसे व व्यापारी उपस्थित होते.शेतकऱ्यांनी त्यांचा शेतमाल मार्केट यार्डवरच विक्रीस आणावा व बाजार समितीस सहकार्य करावे, असे आवाहन बाजार समितीच्या प्रशासक रिता निनावे यांच्यासह सदस्यांनी केले आहे.(तालुका प्रतिनिधी)
खरेदीच्या मुहूर्तावर सोयाबीनच्या १०१ पोत्यांची आवक
By admin | Updated: September 28, 2015 02:28 IST