लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात, अत्यंत महत्त्वाचे देखभाल दुरुस्तीचे काम करायचे असल्याने गुरूवार, २२ मे, २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्यापासून शुक्रवार, २३ मे, २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणी पुरवठा बंद राहील. परिणामी गुरूवार (२२ मे, २०२५) दुपारी १२ वाजल्यापासून शुक्रवार (२३ मे, २०२५) रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत दिवा, मुंब्रा, कळवा या प्रभाग समितीतील सर्व भाग तसेच, वागळे प्रभाग समितीतील रुपादेवी पाडा, किसन नगर नं २, नेहरू नगर आणि मानपाडा प्रभाग समितीतील कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा पूर्ण बंद राहील.
शुक्रवारी दुपारी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर काही काळ कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नागरिकांनी आवश्यक तो पाणीसाठा करून ठेवण्याचे आणि काटकसरीने पाणी वापरून अपव्यय टाळण्याचे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.