सदानंद नाईक
उल्हासनगर : आशेळे गावातील महालक्ष्मी चाळ व कडू चाळीतून अनधिकृतपणे राहणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. गेल्या दोन महिन्यात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात पाच गुन्हे दाखल होऊन एकूण पाच बांगलादेशी नागरीकांना अटक केल्याने आशेळे व मानेरे गाव बांगलादेशी नागरिकांचे आश्रयस्थान बनले का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
उल्हासनगर गुन्हे शाखेने मंगळवारी दुपारी १ वाजता आशेळे गावातील महालक्ष्मी चाळ मधील रूम मध्ये धाड टाकून अनधिकृतपणे व व्हिसा विना राहणाऱ्या रुमा बाबी उर्फ सालया हाफीजूल खान या ४० वर्षीय महिलेवर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली. तसेच तीला राहण्यासाठी आश्रय देणाऱ्या रफिक बिसबाय यालाही ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. तर दुसऱ्या घटनेत विठ्ठलवाडी पोलिसांनी आशेळेगाव येथील कडू चाळीत मंगळवारी सायंकाळी ६ वाजता धाड टाकून अवैधपणे राहणाऱ्या मुनीरुल माहिमुद्दीन सरदार याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात काला. अटक केलेले दोघेही बांगलादेशी नागरिक अनेक महिन्यापासून शहरांत राहत असल्याचे उघड झाले.
गेल्या दोन महिन्यात आशेळे व मानेरे गावातून एकूण ५ बांगलादेश नागरिकांना अवैधपणे राहत असल्या प्रकरणी अटक केली. याप्रकरणी एकूण पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली. तसेच पोलीस परिमंडळ अंतर्गत येत असलेल्या आशेळे, मानेरे गावासह हाजी मलंग परिसरात मोठ्या प्रकमाणात चाळीचे साम्राज्य व अवैधपणे इमारती उभ्या राहिल्या आहेत. याच ठिकाणी बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे बोलले जात असून पोलीस सर्व परिसर पिंजून काढणार येणार असल्याचे मत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ व त्यांचे पथक करणार आहेत..