- प्रज्ञा म्हात्रेठाणे - कोकणातील एकुण १,८०,००० हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड केली जाते. यंदा आंब्याचे उत्पादन केवळ ३० टक्केच झाले असल्याची माहिती आंबा महोत्सवाचे आयोजक आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच, २०२२ साली कोकणातील आंब्याचे उत्पादन ३,२०,००० मेट्रीक टन होते. यातील २६० कोटी रुपयांची आंब्याची विक्री मुंबई व भारतभर केली गेली आणि १०० कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला. दरवर्षी हे उत्पादन घटत जाऊन २०२३ मध्ये २,५६,००० मेट्रीक टन झाले असून १९८ कोटी रुपयांची विक्री देशभर तर ७९ कोटी आंबा निर्यात झाला आहे आणि २०२४ मध्ये १,२८,००० मेट्रीक टन झाले असून १२६ कोटी रुपयांची आंबा विक्री देशभर केली गेली आणि ५४ कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला असे त्यांनी सांगितले.
आ. संजय केळकर यांची संस्कार संस्था व कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित १८वा आंबा महोत्सव १ मे ते १२ मे या कालावधीत गावदेवी मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या आंबा महोत्सवाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी पणन मंडळाने पुरस्कृत केले आहे. कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच, आंबा-फणस पोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, पापड अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे ४५ स्टॉल्स असणार आहेत. धान्याचे 5 स्टॉल तर महिला बचत गटांचे 5 स्टॉल असणार आहेत. यावेळी माजी उपमाहापौर अशोक भोईर, सुभाष काळे, कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, परिवहन सदस्य विकास पाटील, ठाणे जिल्हा हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे आदी उपस्थित होते.
यावर्षी अवेळी पडलेला पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे फळगळ झाली व थ्रीप्स रोग, तुडतुडा किटकांच्या प्रादुर्भावामुळे तीस टक्केच आंबा पीक हाती लागले आहे. त्यामुळे मागील दहा वर्षांपासून सातत्याने कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे. या साऱ्या परिस्थितीचा जाणकार ठाणेकर सहानुभूतीने विचार करेल व वाजवी दरातील दर्जेदार आंबा जास्तीत जास्त खरेदी करून कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ देईल, असा विश्वास आ. संजय यांनी व्यक्त केला.