कल्याण: नवीन जनगणनेनुसार कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या १२ लाख ४६ हजाराच्या घरात पोहोचली आहे. या लोकसंख्येच्या निकषानुसार प्रभागांच्या रचनांमध्येही बदल होणार असून पॅनल पध्दतीमुळे ५८ प्रभाग यापुढे असणार आहेत. सध्या असलेल्या १०७ नगरसेवकांमध्ये अधिक ९ नगरसेवकांची भर पडणार असून त्यामुळे महापालिकेच्या आॅक्टोबर २०१५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत ११६ नगरसेवक निवडुन येणार आहेत. केडीएमसीची पहिली सार्वत्रिक निवडणुक १९९५ साली झाली यात १९९१ च्या जनगणनेनुसार ९६ प्रभागांमध्ये निवडणूक घेण्यात आली. तर २००१ च्या लोकसंख्येनुसार पुढे प्रभाग वाढुन १०७ नगरसेवक निवडुन आले. तर सन २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार महापालिका क्षेत्राची लोकसंख्या आता १२ लाख ४६ हजार ३८१ इतकी आहे.१२ लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असेल त्याठिकाणी निवडून आलेल्या पालिका सदस्यांची किमान संख्या ११५ इतकी असेल तसेच १२ लाखांपेक्षा अधिक असलेल्या प्रत्येक ४० हजार इतक्या अधिक लोकसंख्येला एक अतिरिक्त पालिका सदस्य अशी महाराष्ट्र महापालिका अधिनियम ५ मध्ये तरतूद आहे. यानुसार तसेच शासनाने २०११ मध्ये पॅनल पध्दतीच्या केलेल्या नियमानुसार केडीएमसीची आगामी निवडणूक पार पडणार आहे. पॅनल प्रमाणे ५८ प्रभाग राहणार असल्याने प्रत्येक प्रभागातुन दोन असे ११६ नगरसेवक निवडले जातील. यात एक महिला असणार आहे. पॅनल मुळे मतदाराला दोघांना मतदान करण्याचा अधिकार राहणार आहे. ५० टकके आरक्षणामुळे ११६ नगरसेवकांपैकी ५८ महिला नगरसेविका असणार आहेत अशी माहीती केडीएमसीचे माजी सचिव तथा निवडणूक तज्ज्ञ चंद्रकांत माने यांनी लोकमतशी बोलताना दिली. नव्या पॅनल पध्दतीनुसार ११६ नगरसेवक निवडून येणार असले तरी स्वीकृत सदस्यांची संख्या ५ इतकीच राहणार आहे. (प्रतिनिधी)
आगामी निवडणुकीत ९ नगरसेवक वाढणार
By admin | Updated: November 4, 2014 23:16 IST