मनोर/पालघर : आदिवासींच्या जमिनींवर करण्यात आलेले अतिक्रमण आपण एकत्र आल्या शिवाय दूर होणार नाही. आदिवासींच्या सबलीकरणासाठी आपण वारली आर्ट कला केंद्र मंजूर केल्याचे आदिवासी विकास व पालकमंत्री विष्णू सवरा यांनी सांगितले. ते मनोर येथे १४१ वी बिरसा मुंडा जयंतीनिमित्त पालघर तालुक्यातील मनोर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.यावेळी सवरा म्हणाले की, लवकरच आदिवासी भवन सुद्धा मी मंजूर करून घेणार आहे. मी बारीक असल्याने माझ्यावर सर्व तुटून पडतात मात्र मी सुद्धा त्यांना जुमानत नाही. यावेळी माजी खासदार बळीराम जाधव म्हणाले की, आदिवासींची दुरावस्था मी ४१ वर्षे बघितली आहे, अजून किती बघायची? बिरसा मुंडा जयंतीला सरकारी सुट्टी जाहीर करा. कारण त्यांनीही देशासाठी बलिदान दिले आहे. यावेळी आमदार विलास तरे, माजी राज्यमंत्री राजेंद्र गावित व प्रकाश गडम, सुरेश जनाठे आदींनी बिरसा मुंडा यांनी देशासाठी व समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली. बिरसा मुंडा जयंती निमित्त आदिवासी समाजकडून सांस्कृतिक कार्यक्रम, स्वच्छता अभियान, रांगोळीस्पर्धा, चित्रकलास्पर्धा, आदिवासी समाजाची पारंपरिक नृत्ये असे विविध कार्यक्रम आयोजिले होते.यावेळी सरपंच जागृती हेमाडे, जोत्स्ना गोवारी, पांडुरंग गोवारी पं. स. सदस्य, सुरेश जनाडे आदी नेते पुढारी कार्येकर्ते, उपस्थीत होते. (वार्ताहर)
‘एकत्र आल्याशिवाय अतिक्रमणमुक्ती नाही’
By admin | Updated: November 17, 2016 04:58 IST