प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाण्यातील खोपटचा राजा गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामी देऊन गेल्या वर्षीच्या दहीहंडी उत्सवात प्रथमच इतिहास रचला. ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी तो अभिमानाचा क्षण ठरला. मुंबईच्या गोविंदा पथकांना टक्कर देण्यासाठी ठाण्यातील गोविंदा पथकांनी यंदाही कंबर कसली आहे. मुंबईकरांची मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी यंदा एक नव्हे तर तीन तीन गोविंदा पथके नऊ थरांची सलामी देण्यासाठी सराव करीत आहेत, असे गोविंदा पथकांनी सांगितले.
मुंबईतील गोविंदा पथकांची मक्तेदारी मोडीत काढण्यास आता ठाण्यातील गोविंदा पथके पुढे आली आहेत. ठाण्यातील गोविंदा पथकांनी सरावास सुरुवात केली आहे. खोपटचा राजा, ठाण्याचा राजा, सहयोग गोविंदा पथक यंदा नऊ थरांची सलामी देणार आहेत. शहरातील अनेक गोविंदांचा आत्मविश्वास वाढला असून, नऊ थरांची सलामी देण्यासाठी अनेक गोविंदा पथके पुढे येतील, असा विश्वास समीर पेंढारे यांनी व्यक्त केला.
आमच्या गोविंदा पथकांची सरावाला सुरुवात झाली आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही आम्ही नऊ थरांची सलामी देणार आहोत. टेंभी नाका आणि गोकुळ हंडीत आम्ही नऊ थर लावले. गोकुळ हंडीत नऊ थरांचा प्रयत्न फसला. पण, टेंभी नाका येथे नऊ थरांची यशस्वी सलामी दिली. खोपटच्या राजाने नऊ थर लावले म्हणून आम्हीही नऊ थर लावू शकतो, हा आत्मविश्वास गोविंदा पथकांमध्ये आला आहे.-समीर पेंढारे, खोपटचा राजा
यावर्षी ठाण्याचा राजा गोविंदा पथक नऊ थर लावणार आहे. त्यादृष्टीने आमचा सराव सुरू आहे. मुंबईच्या तोडीस तोड गोविंदा पथके ठाण्यातही तयार होत आहेत. गेल्या वर्षी आम्ही मनसेच्या दहीहंडी उत्सवात प्रयत्न केला होता. १ जूनपासून आम्ही सरावास सुरुवात केली आहे. नववा थर वाढवण्यासाठी जे प्रयत्न करावा लागतो, त्याचा सराव, तशी रचना आखली जाणार आहे.-राकेश यादव, ठाण्याचा राजा