ठाणे : धोकादायक आणि अनधिकृत बांधकामांबाबत शासनाच्या तसेच महापालिकेच्या बदलत्या धोरणांमुळे अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या कुटुंबीयांच्या निवाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यात आता येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी अशा इमारती आणखी धोकादायक ठरू नयेत, म्हणून त्यांचा पालिकेने पुन्हा सर्व्हे सुरू केला आहे. येत्या एप्रिलअखेरपर्यंत तो पूर्ण होणार असून मागील वर्षी असलेली धोकादायक इमारतींची ३३३५ ही संख्या सध्या तरी तितकीच आहे. परंतु, नव्या सर्व्हेत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या इमारतीमधील रहिवाशांचा जीव टांगणीला लागला आहे. गेल्या काही वर्षांतील अशा इमारती कोसळण्याच्या घटना पाहता इमारती पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पाडण्याची कारवाई गेल्या वर्षीपासून पालिकेने हाती घेतली होती. त्यात शासनाच्या नव्या धोरणानुसार आता अशा इमारतींची वर्गवारी करण्यात येत असल्याने ज्या इमारती राहण्यास संपूर्णपणे अयोग्य आहेत, त्या तत्काळ खाली करून पाडण्याची कारवाई करण्यात येत आहे. यंदाही अशा प्रकारच्या कारवाईसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूूनच त्यांच्या सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असून त्यामध्ये महापालिकेतील अभियंत्यांचे पथक इमारतीच्या बांधकामाची तपासणी करीत आहे. सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असल्यामुळे एप्रिलअखेर इमारतींची अंतिम यादी जाहीर होऊ शकेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरवर्षी नव्याने होणाऱ्या सर्वेक्षणामध्ये जुन्या यादीव्यतिरिक्त अन्य इमारती धोकादायक आढळल्या, तर त्यांचा यादीमध्ये समावेश केला जातो. यंदाही अशा इमारतींचा यादीमध्ये समावेश केला जाणार असून त्या पावसाळ्यापूर्वी रिकाम्या करणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. प्रशासनाची भूमिका उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अनधिकृत आणि धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी २०१५ पर्यंतच्या बांधकामांना संरक्षण देण्याची घोषणा विधानसभेत केली असली, तरी याची कोणत्याही प्रकारची अधिसूचना पालिका प्रशासनाकडे आलेली नाही. त्यामुळे या घोषणेची अंमलबजावणी अद्याप करता येणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
अतिधोकादायक इमारतींचा सर्व्हे सुरू
By admin | Updated: April 25, 2017 00:11 IST