- पंकज पाटीलअंबरनाथ : शहरातून जाणारा कल्याण-बदलापूर रस्ता हा सुरक्षेच्या कारणावरून पुन्हा चर्चेत आला आहे. या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते. सोमवारी या रस्त्याचे काम सुरू झाले आहे; मात्र महामर्गाचे काम करताना अपघात टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. तसेच, रस्त्यासाठी खोदकाम करताना वाहतुकीने गजबजलेला रस्ता सुरक्षित करणे गरजेचे असतानाही त्याठिकाणी सुरक्षेसाठी दोरी किंवा बॅरेकेटिंग लावण्यात आलेले नाही. त्यामुळे बेसावध वाहन थेट खड्ड्यात पडण्याची भीती निर्माण झाली आहे.अंबरनाथमध्ये अडकून पडलेला कल्याण-बदलापूरमार्गे पुण्याला जोडणारा राज्य महामार्गाचे काम ठेकेदाराने सुरू केले आहे. हे काम करताना अनेक ठिकाणी सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सर्वच ठिकाणी एकत्रित काम सुरू असून अस्तित्वातील रस्ता आणि नव्याने तयार करण्यात येणारा रस्ता यांच्यासाठी खोदण्यात येणारे खड्डे हे जीवघेणे ठरण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी बॅरिगेट्स, सूचना फलक लावणे गरजेचे आहे. मात्र, अनेक ठिकाणी असे फलकच लावलेले नाहीत. विम्को नाका ते शंकर मंदिर, आयटीआयसमोरील रस्त्यांवरही अशीच स्थिती आहे. रस्त्याचे काम करीत सुरक्षेची जबाबदारी ही ठेकेदाराची असतानाही ठेकेदार या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहे.सहा महिन्यांपासून या रस्त्याचे काम रखडलेल्या अवस्थेत होते. जलवाहिनी स्थलांतरित होत नसल्याने काम करता येत नसल्याचे कारण पुढे केले जात होते. आता ठेकेदाराने परस्पर काम सुरू करून जलवाहिनीचे काँक्रीट खाली दाबण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जलवाहिन्या स्थलांतरित होत नाहीत तोवर काम करता येणार नाही, असे सबब देणारे अधिकारीच आता या जलवाहिन्या काँक्रीट खाली दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भविष्यात जलवाहिनी फुटल्यास रस्ता खोदण्याची वेळ येणार आहे.जलवाहिनीच्या ठिकाणी भर टाकून कामफॉरेस्ट नाका परिसरात रस्त्याच्या एक फुटावर जलवाहिनी असल्याने काँक्रीटचे काम करणे शक्य नाही. त्यामुळे आता त्याच्यावर वाढीव माती भराव करून हा रस्ताच वर उचलण्यात येत आहे. त्यामुळे शेजारी असलेली दुकाने किंवा कंपन्या या रस्त्यापासून खाली गेल्या आहेत. अधिकारी या अडचणी न सोडवताच रस्त्याचे काम उरकण्याचा प्रयत्न करत आहेत. उल्हासनगर महापालिका, जीवनप्राधिकरण, अंबरनाथमधील एका बड्या बिल्डरची जलवाहिनी ही याच मार्गावरून गेली आहे. ती स्थलांतरित न करताच काम सुरू केले आहे.
महामार्गाचे काम सुरू; मात्र सुरक्षेकडे दुर्लक्ष, अपघाताची भीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 01:21 IST