लोकमत न्यूज नेटवर्क, धीरज परब / मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये बांगलादेशी सह नायजेरियन नागरिकांचे बेकायदा वास्तव्यचे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत . परंतु काशीगाव पोलिसांनी बनावट आधारकार्ड बनवून राहणाऱ्या श्रीलंकन नागरिकास पकडले आहे . श्रीलंकेत हत्या करून तो भारतात पळून आला आहे . त्यामुळे श्रीलंकन नागरिकांची घुसखोरी देखील समोर आली आहे .
काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक महेश तोगरवाड यांच्या निर्देशा नुसार पोलीस ठाणे हद्दीतील लॉजिंगची अचानक जाऊन तपासणी केली जात आहे . महामार्गावरील वेस्टर्न हॉटेल मध्ये पोलीस उपनिरीक्षक अभिजित लांडे व पथकाने १३ जानेवारीच्या रात्री तपासणी चालवली असता तेथे अरुमाहद्दी जनिथ मदुसंघा डिसिल्वा ( वय ३६ वर्ष ) हा श्रीलंकन नागरिक आढळून आला .
त्याच्या कडील आधारकार्डची पडताळणी केली असता ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले . पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने श्रीलंकेत कौटुंबिक वादातून २०१५ साली एका बड्या व्यक्तीची हत्या केल्याचे समजल्यावर पोलीस अधिक सतर्क झाले . त्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती .
सुमारे ७ वर्ष तेथील कारागृहात बंदी होता . १३ डिसेम्बर रोजी तो जामिनावर सुटल्या नंतर तो समुद्र मार्गाने बेकायदेशीरपणे रामेश्वरम येथे उतरला . तेथून ट्रेन ने त्याने मुंबई गाठली . पोलिसांना त्याने श्रीलंकन भाषेत त्याच्या अटक व जामीन संदर्भातील बातम्यांची लिंक पोलिसांना दाखवली .
जामिनावर सुटल्यावर त्याला जीवाला धोका असल्याचे वाटू लागल्याने तो त्याचा परदेशातील टोनी नावाच्या मित्राच्या मदतीने डिसेम्बर मध्ये भारतात आला . त्याच्यासाठी बनावट आधारकार्ड , सिमकार्ड व मोबाईल याची व्यवस्था नालासोपारा येथून केली गेली असल्याचे सूत्रांनी सांगितले . सिमकार्ड हे दुसऱ्याच्या नावावर आहे.
या प्रकरणी पोलीस त्याची अधिक चौकशी करत असून त्याने सांगितलेली माहिती याची पडताळणी केली जात आहे . आरोपीला गुरुवार पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे .