उल्हासनगर : शहरात ताप आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तापाचे १७००, डेंग्यूचे संशयित ३८, तर मलेरियाच्या ४१ रुग्णांची पालिकेकडे नोंद झाली आहे. दरम्यान, डेंग्यूने साहिल भालेराव (१७) या मुलाचा मृत्यू झाला. उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या रुग्णालयावर कारवाईची मागणी कुटुंबाने केली आहे. उल्हासनगरमध्ये नियमित कचरा उचलला जात नाही. परिणामी, कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरली आहे. ताप व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी करत कारवाईची मागणी आयुक्तांकडे केली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाकडे जानेवारीपासून तापाचे १७००, तर डेंग्यूच्या ३८ रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णालयात खाटा मिळत नसल्याने रुग्णांना जमिनीवर झोपण्याची वेळ आल्याची माहिती मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा चिकित्सक डॉ. अशोक नंदापूरकर यांनी दिली.शहरातील कॅम्प नं.-४ दहाचाळ विभागात राहणाऱ्या साहिलला ताप आल्यानंतर प्राथमिक उपचारासाठी खाजगी दवाखान्यात नेले. दुसऱ्या दिवशी रामरक्षा रुग्णालयात दाखल केल्यानंतरही तब्येतीत सुधारणा न झाल्याने चार दिवसांनी एम्स रुग्णालयात नेले. उपचारादरम्यान साहिलचा मृत्यू झाला. त्याच्या पालकांसह कुटुंबांनी साहिलवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे. ताप व डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने जनजागृती केली. तसेच औषधांची खरेदी करून आरोग्य केंद्रासह रुग्णालयात पुरवण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. राजा रिजवानी यांनी दिली. १५ दिवसांत डेंग्यूचे संशयित १६ रुग्ण आढळले. त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार करून घरी सोडून दिले, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
उल्हासनगरमध्ये डेंग्यूने मुलाचा मृत्यू?
By admin | Updated: September 8, 2016 02:50 IST