वरपगाव : विद्यार्थी, नागरिक, महिला आदींना त्यांच्या विविध दाखल्यांसाठी दररोज तहसील कार्यालयात खेटे मारावे लागतात. यातूनही दलालांच्या तावडीत सापडल्यावर नागरिकांची लूट होते. हे टाळण्यासाठी कल्याणचे तहसीलदार किरण सरवसे यांनी १ आॅगस्ट या महसूल दिनापासून तालुक्यात दाखल्यांसाठी एसएमएस सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे़ यामुळे नागरिकांच्या वेळेचा व पैशांचा अपव्यय टाळता येणार आहे. हा प्रयोग राज्यात प्रथमच होत असल्याचे तहसीलदारांचे म्हणणे आहे. टोकन देऊन पुढील प्रक्रिया पार पडणार असल्याने कार्यालयातील गर्दी टळून सर्वांना वेळेत दाखले मिळण्यास मदत होणार आहे.कल्याण तहसीलअंतर्गत १२४ महसुली गावे, २८ तलाठी सजे, पाच मंडळ कार्यालये असून २० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे. संजय गांधी, पुरवठा विभाग, बिगरशेती आदी प्रमुख विभाग येथे आहेत. कार्यालयातील सेतू सुविधेच्या माध्यमातून आतापर्यंत ३० ते ४० हजार दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्यासाठी १४ शिबिरे घेण्यात आली. जातीचे दाखले, डोमिसाइल, वास्तव्याचे दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, उत्पन्नाचे दाखले आदींसह विविध दाखल्यांसाठी सेतू कार्यालयासमोरील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दलालांची गर्दी वाढली होती. त्यावर उपाय म्हणून तहसील कार्यालयाने हा उपाय शोधून काढला आहे़ (वार्ताहर)
कल्याण तहसीलकडून दाखल्यांसाठी एसएमएस
By admin | Updated: July 29, 2014 00:28 IST