Rajan Salvi Joined Shiv Sena Eknath Shinde Group: २०२४ मध्ये पराभवाला सामोरे जावे लागले, याला जबाबदार कोण? हा प्रश्न मांडला आहे. २०१४ मध्ये भाजपा सेनेची युतीची सत्ता आली. त्या युतीमध्ये वाटले होते की, माझ्यासारखा निष्ठावंत मंत्री होईल म्हणून. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंकडे माझी शिफारस केली होती, पण दुर्दैवाने होऊ शकलो नाही. पण शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी त्यावेळी दीपक केसरकर यांना मंत्री केले. राजन साळवी तिथेच राहिला. तो काळ गेला, २०२४ ची निवडणूक आली, तेव्हाही वाटले होते राजन साळवीला संधी मिळेल, मंत्री होईल. उदय सामंत शिवसेनेत आले आणि २०१९ ला मंत्री झाले, अशी मन की बात राजन साळवी यांनी बोलून दाखवली.
गेल्या काही महिन्यांपासून माजी आमदार राजन साळवी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर राजन साळवी यांनी ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा आणि पक्ष सदस्याचा राजीनामा दिला आणि शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजन साळवी यांचा प्रवेश झाला. यावेळी उदय सामंत आणि किरण सामंत हे दोन्ही बंधू उपस्थित होते. शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजन साळवी यांनी मन मोकळे केले आणि अनेक गोष्टी बोलून दाखवल्या. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरच एक मोठी मागणीही केली.
मी समाधानी, आनंदी, पण माझी एकच अपेक्षा आहे की...
२०२४ च्या निवडणुकीत आम्ही पराभूत झालो. पराभव मान्य केला. पण २०२४चा पराभव हा माझ्या कुटुंबाला आणि पदाधिकार्यांच्या जिव्हारी लागला. गेले आठवडाभर राजन साळवी यांना विधानपरिषद देणार, महामंडळ देणार हे मीडियाच्या माध्यमातून सांगितले जात आहे. पण एकनाथ शिंदे यांना एवढेच नम्रपणे सांगेन की, शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सर्व काही मिळाले आहे. मला काही नको. मी अत्यंत समाधानी आणि आनंदी आहे. माझी फक्त एकच अपेक्षा आहे की, माझ्याबरोबर आलेले राजापूर-लांजा मतदारसंघातील सर्व मतदार, माझे शिवसैनिक, माझे पदाधिकारी त्यांना योग्य तो सन्मान आणि योग्य त्या अनुषंगाने जे काही देता येईल ते द्यावे. माझ्यापेक्षा माझ्या पदाधिकाऱ्यांना सांभाळावे अशी विनंती करतो, असे राजन साळवी यांनी सांगितले.
दरम्यान, मी स्वत:ला नशीबवान समजतो, कारण ही जागा पवित्र आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्पर्शाने ही जागा पवित्र झाली आहे. गेले ३८ वर्ष शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेत काम करत असताना नगरसेवक, नगराध्य़क्ष, शिवसेनेचा जिल्हाप्रमुख, २००९, २०१४, २०१९ या कालावधीत मी आमदार होऊ शकलो, त्यानंतर शिवसेना उपनेता झालो. एक दु:ख नक्कीच आहे की अडीच वर्षापूर्वी भाई मुख्यमंत्री होत असताना त्यांच्याबरोबर जाऊ शकलो नाही. ती त्या वेळेची परिस्थिती असेल. पण निश्चितपणे त्यानंतरच्या काळात हा निर्णय घेतला आणि एकनाथ शिंदे यांनी मला सामावून घेतले. हा आनंदाचा क्षण आहे, असे साळवी यांनी म्हटले आहे.