अभियंत्यांच्या प्रश्नांबाबत महावितरण प्रशासन उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 11:57 PM2020-09-21T23:57:55+5:302020-09-21T23:58:34+5:30

कोरोना संकटकाळात जीव धोक्यात घालून काम : असोसिएशन आंदोलनाच्या पवित्र्यात

MSEDCL administration indifferent to engineers' questions | अभियंत्यांच्या प्रश्नांबाबत महावितरण प्रशासन उदासीन

अभियंत्यांच्या प्रश्नांबाबत महावितरण प्रशासन उदासीन

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : कोविडच्या परिस्थितीत जिल्ह्यात एक बळी आणि ३० कर्मचारी बाधित झालेले असताना सर्व अभियंते व एसईए संघटना प्रशासनास प्रत्येक गोष्टीत सर्र्वतोपरी सहकार्य करीत आहेत. मात्र महावितरण प्रशासन अभियंत्यांच्या प्रश्नांबाबत कमालीचे उदासीन असल्यामुळे अभियंत्यांमध्ये प्रचंड नाराजी असून निषेध आंदोलनाची तयारी सुरू
केली आहे.
सध्या संपूर्ण राज्यभरात कोविड-१९ सारख्या महामारीने अक्षरश: थैमान घातलेले आहे. अशी कठीण परिस्थिती असतानाही महावितरणमधील सर्व अभियंते कोविड सेंटर, हॉस्पिटल्स व विलगीकरण कक्ष तसेच सर्वच ग्राहकांना अखंडितपणे वीजपुरवठा करण्याचे काम केले जात आहे. जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडत असून वाडा विभागातील ४८ वर्षीय उच्चस्तर लिपिक अतुल भोईर यांचा मृत्यू झाला असून ३० अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
अशी आणीबाणीची परिस्थिती असतानासुद्धा सर्व अभियंते व एसईए संघटना प्रशासनास प्रत्येक गोष्टीत सर्र्वतोपरी सहकार्य करीत आहेत, मात्र महावितरण प्रशासन अभियंत्यांच्या प्रश्नांबाबत कमालीचे उदासीन असून त्यामुळे अभियंत्यांची प्रचंड नाराजी आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रशासनाने १५ टक्के बदल्यांचे परिपत्रक काढल्यानंतरही महावितरण प्रशासनाने मात्र फक्त जेई ते एईईच्या बदल्यांना अजून मुहूर्त सापडत नसून आॅक्टोबर महिना तोंडावर आला असताना सुद्धा अभियंत्यांची एकही विनंती बदली करण्यात आलेली नाही. उलटपक्षी कोविडसारखी भयावह परिस्थिती असताना ‘अनिवार्य रिक्त पदे’ ठेवण्याची अफलातून संकल्पना राबवली आहे. रिक्त पदे ठेवल्याने अनेक समस्या वाढीस लागणार असून अनिवार्य रिक्त पदांमुळे ग्राहकांना सेवा देताना अडचणीचे ठरणार असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
महावितरण आधीच कठीण वित्तीय परिस्थितीतून जात असताना व क्षेत्रीय स्तरावर अनेक महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित असताना त्याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, त्यावर सबॉर्डिनेट अभियंता संघटनेने महावितरण प्रशासनाला वेळोवेळी उपायही सुचविले आहेत. मात्र त्याकडे प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असून मागील काही महिन्यांपासून बदली धोरणावर जास्त लक्ष केंद्रित करीत आहे. त्यातही अनिवार्य रिक्त पदे ठेवणारच अशी भूमिका घेत असल्याने सर्व अभियांत्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
एकीकडे कंपनीची आर्थिक परिस्थिती कठीण असताना संघटनेने महसूल वसुलीबाबत, इंपालमेंटमधील त्रुटी इ. बाबीवर कशा प्रकारे मात करता येईल हे वेळोवेळी सुचविले आहे, मात्र हे महावितरण प्रशासन बदली या विषयावर विनाकारण वेळ वाया घालवत असून संपूर्ण महाराष्ट्रातील सबोर्डिनेट इंजिनीयर्स असोसिएशनचे अभियंते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
याबाबत राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना भेटून निवेदन दिले असून सदर प्रलंबित प्रश्नाबाबत लक्ष देण्याची विनंती केली आहे. प्रशासनाने वेळीच तोडगा काढला नाही तर सोमवारपासून निषेध आंदोलन चालू करण्याच्या विचारात संघटना असल्याचे संघटनेचे सहसचिव (पालघर जिल्हा) लक्ष्मण राठोड यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
सकारात्मक विचार करा अन्यथा आंदोलन
बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या अभियंत्यांना त्यांच्या विनंती ठिकाणी बदली व्हावी, अनिवार्य रिक्त पदाची संकल्पना रद्द करावी, कनिष्ठ अभियंता ते सहायक अभियंता पदोन्नती पॅनल त्वरित करावे, उपकार्यकरी अभियंता म्हणून पदोन्नती झालेल्या अभियंत्यांना त्यांच्या पॅरेंट झोनमध्ये पदस्थापना द्यावी व संघटनेस विश्वासात घ्यावे, तसेच महापारेषणमध्ये प्रमोशन पॅनल व स्टाफ सेटअपचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित असून प्रशासनाने अद्यापही हे मुद्दे विचारात घेतले नाहीत, आदी मागण्यांच्या पूर्ततेबाबत सकारात्मक विचार न केल्यास संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तीनही कंपन्यांचे अभियंते कोविड परिस्थितीतही आंदोलन करतील, असा निर्वाणीचा इशारा सबॉर्डिनेट इंजिनीअर्स असोसिएशनचे सरचिटणीस अभियंता संजय ठाकूर यांनी दिला आहे.

Web Title: MSEDCL administration indifferent to engineers' questions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.