उल्हासनगर : इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिले. आता त्यांची पुढील पिढी देशसेवेसाठी तत्पर आहे. अशा या गांधी घराण्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी येथे केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्या प्रचारार्थ गोलमैदान येथे सभा झाली, तेव्हा ते बोलत होते. या वेळी गणेश नाईक, संजीव नाईक, ज्योती कलानी, प्रमोद हिंदुराव आदी उपस्थित होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळात रस्ते, धरणे, कारखाने उभारले गेले. तर इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी देशाचे दोन तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली. राजीव गांधी यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती करून देशाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. आज प्रत्येकाच्या हातात जो मोबाइल दिसत आहे, तो केवळ राजीव गांधी यांनी केलेल्या प्रगतीमुळेच, असे पवार यांनी सांगितले.
दहशतवादी ठरवण्याची मोदींची रणनीतीविकास हेच लक्ष्य असल्याचे सांगणारे आता हिंदू धोक्यात आहेत, असे बोलून हिंदू दहशतवाद सुरू करीत आहेत. काँग्रेसने कधीच धर्माच्या नावाखाली हिंदू धर्मावर अन्याय केला नाही. मात्र मोदींच्या बाजूने असलेली एखादी शक्ती त्यांच्याविरोधात गेली की त्या शक्तीला दहशतवादी ठरविण्याची नीती वापरली जाते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवार मिलिंद देवरा यांच्या खेतवाडी येथील जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते.
मराठी भाषिकांच्या पाठीत शिवसेना-भाजपने सुरा खुपसला आहे, असा आरोप मिलिंद देवरा यांनी आपल्या भाषणातून केला. महाआघाडीची सत्ता येताच भाडेकरूंना पाचशे चौरस फुटांचे घर देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.