अनिकेत घमंडी, डोंबिवलीशिवसेनेने सोमवारी रातोरात ए-बी फॉर्मचे वाटप केले. त्या सर्वांनी मंगळवारी तातडीने फॉर्म भरले. मात्र, त्यात डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिकांना डावलण्यात आल्याची भावना आहे. त्यामुळे सैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून तिकीट मिळवण्याचा नेमका क्रायटेरिया काय असतो? पैसा, ओळख, वशिला की पक्षासाठी निष्ठेने झटणे, यापैकी काय कामाला येते, हे माहीत नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना हे चालले असते का? तेव्हा असे नव्हते, अशी खंत करून या मावळ््यांनी आताच्या जिल्हास्तरावरील काही पदाधिकाऱ्यांच्या ‘अर्थ’पूर्ण कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे.रामनगरमधील निष्ठावंत शिवसैनिक आणि मध्यवर्ती शाखेचे २० वर्षांहून अधिक काळ शाखाप्रमुख म्हणून काम केलेल्या राम मिराशी यांचा विचार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि जिल्हा संपर्कप्रमुख, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. किती काळ आणि का सहन करायचे? नेहमीच का डावलले जाते? असे सवालही त्यांनी केले. शाखेवर केवळ निवडणूक एके निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कसे काही नेते येतात, हे जनतेलाही माहीत आहे. त्यामागची त्यांची उद्दिष्टे उघड करण्यासाठी प्रसिद्धिमाध्यमांनी पोलखोल करावी, म्हणजे पक्षात एकंदरीत काय सुरू आहे (डोंबिवली स्तरावर), हे श्रेष्ठींच्या निदर्शनास येईल, असेही ते म्हणाले. >> काय, कुठे, कसे घडले1मिराशींप्रमाणेच शिवमार्केटमधील पक्षाच्याच स्वीकृत नगरसेवकाने ए-बी फॉर्म मिळण्याआधीच फॉर्म भरला होता. त्यांनाही सोमवारी रात्री फोनाफोनी करत असे का केले, याची विचारणा झाली. तसेच तिकीट मागे घेण्याबाबत ‘आदेश’ देण्यात आले.2त्यावर, संबंधित उमेदवाराने उद्धवजींनी स्वीकृत नगरसेवक पद दिले होते, त्यामुळे एक तर त्यांनी अथवा पालकमंत्र्यांनी सांगितले तर विचार करू, असे स्पष्टपणे सांगितले. या संभाषणानंतर अद्याप तरी केतन दुर्वे यांनी फॉर्म मागे घेतलेला नाही. अशीच स्थिती सावरकर रोड येथेही आहे. 3टिळकनगरमध्येही एका जुन्या सैनिकाला डावलण्यात आले आहे. त्यामुळे एकंदरीतच कल्याणच्या तुलनेत डोंबिवलीच्या शिवसैनिकांमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याचे जाणवत आहे.रामनगर हा वॉर्ड ओपन रामनगर हा वॉर्ड ओपन असताना तसेच ब्राह्मण उमेदवार पक्षाकडे असतानाही का डावलण्यात आले? याची खंत त्यांनी व्यक्त केली. पक्षामध्ये काल आलेल्या सैनिकांनी विविध पदे भूषवली, त्याबद्दलही काही नाही. पक्षवाढीसाठी-बळकटीसाठी ते आवश्यकच असते, परंतु निर्णयप्रक्रियेत जुन्या जाणत्यांना विचारात का घेतले जात नाही, असे ते म्हणाले. निदान, यापुढे तरी संपर्कप्रमुख आणि पक्षप्रमुख याची नोंद घेतील आणि न्याय देतील, अशी सकारात्मक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
निष्ठावंत शिवसैनिकांना डावलले!
By admin | Updated: October 15, 2015 01:40 IST