उल्हासनगर : कॅम्प नं-२, येथील संत आशाराम बापू सत्संग आश्रमाची संरक्षण भिंत शेजारील टेकडी खचल्याने पडली. मात्र सत्संग चालू नसल्याने, जीवितहानी टळली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन पडलेली झाडें व ढिगारा बाजूला केला.
उल्हासनगर कॅम्प नं-२, खेमानी परिसरात संत आशाराम बापू सत्संग आश्रम आहे. सत्संग सुरू असल्याने, याठिकाणी नेहमी महिला व नागरिकांची वर्दळ असते. मंगळवारी येथे सत्संग झाल्याने, बुधवारी आश्रमात नागरिकांची वर्दळ कमी होती. दुपारी सत्संग आश्रमाची संरक्षण भिंत शेजारील उंच ठेकडी खचल्याने कोसळली. भिंती सोबत झाडें कोसळून आश्रमाचे पत्रे इतर वस्तूचे नुकसान झाले.
संरक्षण भिंतीसह आश्रमाचे शेड, झाडें पडल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मातीचा ढिगारा व कोसलेली झाडे बाजूला केले. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून धोबी खदान परिसरात अश्या दरड कोसळण्याच्या घटना घडतात. अश्या घटनेकडे महापालिका आपत्कालीन विभागाचे लक्ष असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी दिली.