मुरलीधर भवार, कल्याणमुरबाड मतदारसंघात येणारा कल्याण तालुक्यातील काही भाग पाच मोठ्या रस्त्यांनी जोडला जाणार आहे. तसेच एक हजार एकर जागेवर सुनियोजित शहर विकसित करण्याचा महत्त्वकांशी प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. या प्रकल्पात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रकल्पात ३० टक्केची भागीदारी दिली जाणार आहे. रस्ते विकास व सुनियोजित शहर विकास प्रकल्पामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे भविष्यात टिटवाळा, गोवेली, खडवली ही ठिकाणे विकासाचे केंद्रविंदू ठरणार आहेत. कल्याण-मुरबाड रस्त्याचे चौपदरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कामासाठी जवळपास ७०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या कामाची निविदा भूसंपादनाच्या प्रक्रियेनंतर काढली जाणार आहे. कल्याण ते टोकावडेपर्यंतचा रस्ता काँक्रिटचा केला जाणार आहे. या रस्त्यात असलेल्या नदीवरील पुलांचेही चौपदीकरण करून ते नव्याने विकसित केले जाणार आहेत. त्यामुळे कल्याण-माळशेज मार्गावरील कोंडी दूर होईल. हा रस्ता टोल फ्री असेल. एमएमआरडीएतर्फे शिरसाट फाटा ते उरण रस्ता दुपदरी केला जाणार आहे. हा रस्ता खडवली, गोविली, बदलापूरमार्गे उरणला जोडला जाईल. या रस्त्यावरील भातसा नदीवर खडवली येथील पूल, काळू नदीवरील टिटवाळा येथील पूल आणि उल्हास नदीवरील आपटी येथील पूलही रुंद केले जातील. वडदोरा ते उरणदरम्यान जवळपास ७०० कोटी खर्चून नव्याने सहा पदरी राष्ट्रीय महामार्ग विकसित केला जाणार आहे. हा रस्ता मानिवली, गोवेली, रायते, आणे, भिसोळ, घोटसई या मार्गे उरणला जोडला जाईल. परंतु, वांगणीनजीक सह्याद्रीच्या फूटहिल्स असलेल्या डोंगराला बोगदा पाडून हा रस्ता उरणकडे मार्गस्त होईल. या रस्त्याची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होईल. केंद्र सरकारतर्फे हा प्रकल्प राबवण्यात येईल. मुंबई-नागपूरदरम्यान नवीन सहा पदरी कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे. सरकारचा हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. चिंचवली येथे या रस्त्याचे आउटलेट आहे. याच रस्त्यावर एक हजार एकर जमीन संपादित करून तेथे नवी औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार आहे. त्यास सुनियोजित शहराचा दर्जा दिला जाणार आहे. हा विकास सिडकोच्या धर्तीवर केला जाईल. त्यामुळे फळेगाव उतणे, नडगाव, दानगाव, चिंचवली, राया, उशीद या गावांचा परिसराचा कायापालट होणार आहे. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना प्रकल्पात ३० टक्केची भागीदारी दिली जाईल.शहापूर ते कर्जत चौपदरी रस्त्याचे सर्वेक्षण सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर रस्त्याच्या निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल. हा रस्ता टोलफ्री असेल. या रस्त्यामुळे नाशिक मार्गावरील वाहतूक पुणेमार्गे वळवली जाईल. शहापूर व मुरबाडमधील प्रवासी व मालवाहतूकदारांना कल्याणला वळसा घालावा लागणार नाही.
कल्याण तालुक्यात पाच सक्षम रस्त्यांचे जाळे
By admin | Updated: September 8, 2016 02:25 IST