ठाणे - राज्यात महायुतीची दुसरी इनिंग सुरू झाली आहे. नेत्यांच्या निवडणुका झाल्या. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आल्या आहेत. विधानसभेत ज्या पद्धतीने महायुतीला यश मिळाले, तसेच यश स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही मिळवायचे आहे, असे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केले.
कार्यकर्त्यांच्या पाठीशी महायुती खंबीरपणे उभी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे आदींसह शेकडो पदाधिकाऱ्यांनी, सरंपच, नगरसेवक, शहरप्रमुख आदींसह इतर पदाधिकाऱ्यांनी शनिवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात शिंदेसेनेत प्रवेश केला. यावेळी शहापूरचे जिल्हा परिषद सदस्य, सरपंच व आदी पदाधिकाऱ्यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला.
गेल्या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला यश मिळाले. यापुढेही असेच काम महायुतीचे सुरू राहणार आहे. आम्ही टीम म्हणून काम केले, आताही टीम म्हणून काम करत असल्याचे शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांना चांगले दिवस, सर्वसामान्य माणूस मुख्य प्रवाहात आला पाहिजे, असे ते म्हणाले.