भार्इंदर : पालिकेचा लोगो गेल्या २४ वर्षांपासून प्रशासकीय निष्काळजीपणामुळे अधिकृत न झाल्याने तो भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीने नोंदणीकृत केल्याचे समोर आल्याने पालिकेला आता दुसऱ्या लोगोचा शोध घेऊन तो वेळेत नोंदणीकृत करावा लागणार आहे. १९९१ मध्ये अस्तित्वात आलेल्या नगरपालिकेने आपल्या हद्दीतील ९ ग्रामपंचायतींसह आरोग्य सेवा, शहरीकरण, शेतकरी, मिठागरे, डोंगराळ भाग आदींचा समावेश असलेले चिन्ह वापरात आणण्यास सुरुवात केली. त्यानंतर, २००२ मध्ये स्थापन झालेल्या महापालिकेसाठीही हाच लोगो व्यवहारात आणला. मात्र, गेल्या २४ वर्षांपासून त्याच्या अधिकृत नोंदणीसाठीदेखील योग्य पाठपुरावा न झाल्याची बाब काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका प्रभात पाटील यांनी २० फेब्रुवारी २०१३ रोजीच्या महासभेत निदर्शनास आणली होती. त्या वेळीही वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोणतीही कार्यवाही न करता त्याचे घोंगडे अद्याप भिजत ठेवले आहे. त्यामुळे अनेक जण त्याचा गैरवापर करीत आहेत. पालिकेतील कामचुकारपणाच्या संधीचा फायदा घेत भाजपा नरेंद्र मेहता यांनी काही महिन्यांपूर्वीच या लोगोला नोंदणीकृत करण्यासाठी पत्रव्यवहार केल्याचे उजेडात आले आहे.
प्रशासकीय निष्काळजीपणामुळे पालिकेने गमावले अधिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2015 03:35 IST