शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकशाही’ साहित्याच्या दिशेने...

By admin | Updated: January 29, 2017 03:08 IST

डोंबिवलीत येत्या शुक्रवारपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरते आहे. ज्या पु.भा. भावे यांनी सारस्वतात नवकथेचा नवा प्रवाह आणला, त्यांच्या नावे ही नगरी

- वैशाली रोडे डोंबिवलीत येत्या शुक्रवारपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरते आहे. ज्या पु.भा. भावे यांनी सारस्वतात नवकथेचा नवा प्रवाह आणला, त्यांच्या नावे ही नगरी सजली आहे. ज्या शं.ना. यांनी आपल्या लालित्यपूर्ण, पण संवादी शैलीतून लेखनाचा नवा ठसा उमटवला, त्यांचे हे शहर. नवतेच्या अनेक प्रवाहांना सामावून घेणारे, नवे उपक्रम सुरू करणारे. मराठी साहित्य आता अशाच आधुनिक तंत्राच्या प्रवाहावर स्वार होते आहे. त्याचे अधिकाधिक लोकशाहीकरण होते आहे. साहित्यातील या नवेपणाच्या प्रवाहांचा, त्यातील बदलांचा वेध... साहित्य... किती पूर्वीपर्यंत ताणता येतं आपल्याला? आणि काय येतं डोळ्यांसमोर...? पूर्वीची भूर्जपत्रं आणि त्यावर लिहिलेल्या ओळी? दगडांत कोरलेले शब्द आणि त्यातून गवसणारे अर्थ? की मौखिक परंपरेने चालत आलेली कवनं...? ज्ञानेश्वरांच्या ओव्या, तुकारामाचे अभंग की...इतक्या पूर्वीपर्यंत खरंतर नकोच आहे जायला. काही... म्हणजे अगदी काहीच वर्षांपूर्वीपर्यंत साहित्य म्हटलं की, पुस्तकं यायची डोळ्यांसमोर. कसली पुस्तकं होती ही? ऐतिहासिक, पौराणिक कथांपासून राजेरजवाड्यांचे आयुष्य मांडणाऱ्या पटापर्यंत आणि तुमचंआमचं आयुष्य मांडणाऱ्या कथांपासून आपल्याला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तींच्या चरित्रांपर्यंत! अर्थात, हा फारच मोठा पट झाला काळाचा. त्यातही काळाप्रमाणे फरक होत गेला होताच. मराठी वाचकाला ‘आपलं’ वाटणारं साहित्य लिहिलं जायला १९४० चं दशक उजाडावं लागलं. याच काळात गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, पु.भा. भावे, ग.दि. माडगूळकर जोमाने लिहिते झाले आणि शहरी मध्यमवर्गाचं जीवन आणि जाणिवा त्यांचीच भाषा घेऊन साहित्यात आल्या. याच प्रवाहात पुढे अनेक लेखक सामील झाले आणि त्यांनी आपापला ठसा साहित्य क्षेत्रावर उमटवला. मानवी संबंध, या संबंधांतली आणि अंतर्मनातली गुंतागुंत यांचा ताकदीने वेध घेणारे पु.भा. भावे आणि रोजच्या जगण्यातल्या छोट्याछोट्या गोष्टींतून संपूर्ण मानवी मनाचा शोध घेऊ पाहाणारे शं.ना. नवरे, ही यातली आघाडीची नावं होती... आहेत. दोघंही डोंबिवलीकर, हा योगायोग नसावा. डोंबिवली ही त्या वेळी मराठी मध्यमवर्गाची राजधानी होती आणि मध्यमवर्गीयांच्या लेखकांनी तिथे राहणं अगदीच स्वाभाविक होतं. मधल्या काळात मराठी माणूस बदलला, मराठी मध्यमवर्ग बदलला, मराठी साहित्यही बदललं. वेगवेगळे वर्ग लिहिते झाले. त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने आणि त्यांच्याच भाषेत साहित्यात उमटत गेलं. पंचवीसेक वर्षांपूर्वी देशात वेगवेगळ्या पातळ्यांवर झपाट्याने बदल झाले... राजकारण, समाजकारण, अर्थकारण ते तंत्रज्ञान. या बदलांचा झपाटा आणि आवाका याने सगळी संस्कृतीच घुसळवून टाकली. माणूस बदलला, त्याचे विचार बदलले, माणसांतले संबंध बदलले, एकमेकांशी आणि स्वत:शीही बोलण्याची भाषा बदलली आणि स्वाभाविकपणे, हे सारं व्यक्त करणारं साहित्यही बदललं. माहिती तंत्रज्ञान आणि त्याने केलेली क्र ांती या साऱ्याचं माध्यम बदलून गेलं. बदलाचा हा झंझावात आला आणि सगळं उन्मळून गेला, असं झालं नाही, तो इथे पाय रोवून राहिला. पण, तो इथे स्थिर झाला, असंही झालं नाही. त्यात काही ना काही बदल होत राहिले... अजूनही होत आहेत आणि ते काळाशी सुसंगतच आहे. साहित्यातलं नवं तंत्रज्ञान, नवी माध्यमं यांची चर्चा आजवर भरपूर झाली आहे. ई-बुक्स तर आपण पाहतो आहोत, वाचतोही आहोत. रोजचं वर्तमानपत्रही आपण ई-पेपरच्या स्वरूपात वाचतो, तर पुस्तकांचं काय? कोणत्याही क्षणी त्याची उपलब्धता, येता जाता कुठेही, कसंही वाचण्याची सोय, कागदाची बचत, पर्यायाने पर्यावरणाचं संरक्षण, हे त्याचे फायदे आहेत. कोणाला झाला आहे याचा फायदा? तो परदेशात राहणाऱ्या मराठी जनांना आपल्या मातीशी आणि साहित्याशी जोडलं जाण्यासाठी झाला आहे, तसाच ग्रामीण भागातल्या नवसाक्षर वर्गालाही झाला आहे. आठ वर्षांपूर्वी मराठी ई-बुक्स सुरू केलेल्या ई-साहित्य प्रतिष्ठानचे सुनील सामंत सांगतात, ‘वर्षाला साधारण ४० लाख वाचक मिळवणाऱ्या आमच्या साइटवरच्या पुस्तकांचा ३० टक्के वाचक परदेशी मराठी वाचक आहे, तर ३० टक्के वाचक तालुक्याचं गावही दूर असणारा ग्रामीण. अगदी मेंढपाळही आहेत यात... त्यांच्या प्रतिक्रि या येत असतात.’ लेखकांना लेखनावर जगता आलं पाहिजे, नुसतं जगता नाही, चांगलं, एक्झिक्युटिव्ह लाइफ जगता आलं पाहिजे, हे ध्येय मनाशी ठेवून काही लेखक-कवींनीच सुरू केलेल्या ई-साहित्यचं आता लक्ष्य आहे एक कोटी वाचकसंख्या गाठण्याचं. एकतर ई-बुक प्रसिद्ध करण्यासाठी खूपच थोडा खर्च येतो. कारण कागद, छपाई हे महत्त्वाचे खर्च नसतात. त्यामुळे पुस्तकाची किंमत आवाक्यात राहू शकते. लेखकाला मानधन आणि प्रत्येक डाउनलोडमागे रॉयल्टी मिळू शकते. काही अपवाद वगळता लेखकाने स्वत:च पैसे देऊन प्रकाशकांकडून पुस्तक छापून घेण्याच्या आणि पुस्तक खपेल की नाही, या भीतीने प्रकाशकाने ते बऱ्यापैकी मोठ्या किमतीला विकण्याच्या आजच्या जमान्यात हा किंमत जास्त म्हणून वाचक कमी आणि वाचक कमी म्हणून किंमत जास्त, या दुष्टचक्र ातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. ई-साहित्य आणि गेल्या सातआठ वर्षांत सुरू झालेल्या ई-बुक्स देणाऱ्या आणखी काही वेबसाइट्स आता त्या दिशेने वाटचाल करत आहेत. फक्त वेबसाइटच नाही, मोबाइल अ‍ॅप, व्हॉट्सअ‍ॅप या माध्यमातूनही आता त्या ई-बुक्स देत आहेत. (ई-साहित्य प्रतिष्ठानने परवा २६ जानेवारीपासून ७७१०९८०८४१ या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर ‘श्यामची आई’ हे पुस्तक उपलब्ध केलं आहे. या नंबरवर मागणी नोंदवली की, वाचकांना त्यांच्या नंबरवर त्याची पीडीएफ मिळू शकणार आहे. यापुढे ई-साहित्य महिन्याला एक पुस्तक व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध करणार आहे.) खरं आहे, साहित्याचं बाह्य रूप आता बदललं आहे. ते कालसुसंगत, तंत्रज्ञान सुसंगत झालं आहे. पण त्याच्या आंतरिक स्वरूपाचं काय? हे समजून घेण्यासाठी थोडं खोलात शिरायला हवं. साहित्याचं वैशिष्ट्य समजून घ्यायला हवं. इंग्रजीत वेगवेगळ्या शब्दकोशांत ‘लिटरेचर’, अर्थात साहित्य म्हणवल्या जाणाऱ्या लेखनाची काही वैशिष्ट्यं सांगितली आहेत. कलात्मक गुणवत्ता. बौद्धिक गुणवत्ता. उत्कृष्ट आशय. उत्कृष्ट अभिव्यक्ती. उत्कृष्ट रचना. आशयाची शाश्वतता... आजच्या तरुणाईच्या जगण्यातले ताणेबाणे चितारणारी मनस्विनी लता रवींद्रची सिगारेट्स, अलविदा ही नाटकं ते ब्लॉगच्या आरशापल्याड हा कथासंग्रह; याच पिढीचं तंत्रज्ञान पकडणारी श्रुती आवटेची कादंबरी लॉग इन, ऐश्वर्य पाटेकरच्या जगण्याचं भान देणाऱ्या कविता, दिशा केने या तृतीयपंथीयाच्या बेधडक प्रश्न विचारणाऱ्या आणि तितक्याच ठामपणे त्यांची उत्तरंही मागणाऱ्या कविता... हे आणि असे अनेक लेखक, त्यांचं पुस्तक ते ब्लॉग आणि फेसबुक असं वेगवेगळ्या माध्यमांतलं लेखन ही सगळीच्या सगळी वैशिष्ट्यं लेवून येतं. मुळात साहित्य असो की आणखी कोणतीही कला, त्यात नवी पिढी कसा विचार करते आहे, कशी अभिव्यक्त होते आहे, यावर तिचं भवितव्य अवलंबून असतं. मराठी साहित्याच्या नावाने अनेकदा गळेही काढले जात असतात. बरे लेखनच येत नाही, वगैरे... पण मुळात आता पुस्तके म्हणजेच साहित्य, ही संकल्पनाच बदलते आहे. सोशल मीडिया, अर्थात समाजमाध्यमं इतकी सर्वदूर पोहोचत आहेत की, लेखक आणि वाचकसुद्धा आता कोणीही होऊ शकतो आहे आणि या माध्यमांनुसारच त्यातली अभिव्यक्तीही बदलत आहे. ब्लॉग लिहिणारे, फेसबुकवर नियमित पोस्ट टाकणारे, व्हॉट्सअ‍ॅपवर व्यक्त होणारे असंख्य क्षेत्रातले, वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेले, वेगवेगळ्या परिस्थितीत काम करणारे आणि जगणारे असंख्य लोक आहेत. त्यांच्यासाठी बहुधा प्रथमच लेखन इतकं सहज आणि सोपं झालं आहे. एकीकडे राजकीय आणि सामाजिक विश्लेषक आजच्या परिस्थितीचं विश्लेषण करत आहेत, दुसरीकडे शाळांमध्ये प्रयोग करत मुलांना त्यांच्याच पद्धतीने फुलू देणारे शिक्षक आपले अनुभव शेअर करत आहेत. एकीकडे लिंगभावावर आधारित भेदावर हिरिरीने चर्चा होत आहेत, तर दुसरीकडे पर्यावरणावर काम करणारे कार्यकर्ते जीव तोडून पर्यावरणाच्या समस्या आणि त्यावरची संभाव्य उत्तरं मांडत आहेत. जितक्या ताकदीने मालक व्यक्त होतो आहे, तितक्याच ताकदीने नोकरही आणि जितक्या कौशल्याने गुरू, तितक्याच मनस्वीपणे शिष्यही! इतका मोठा समाजगट व्यक्त होणं, ही अभिव्यक्तीची क्रांती आहे. लेखकांत जितकं वैविध्य, तितकंच वैविध्य त्यांच्या अनुभवांत, ते अभिव्यक्त करण्याच्या पद्धतीत, त्यांच्या भाषेत आणि निवडलेल्या आकृतीबंधातही. साहित्य म्हणजे यापेक्षा वेगळं काय आहे? जितके त्यात प्रयोग होत राहातील, तितकं ते समृद्ध होत जाईल.अर्थात, हेही खरं आहे की, हे सगळं इंटरनेट आणि स्मार्ट फोन किंवा कॉम्प्युटर असलेल्यांनाच लागू होतंय!... इतरांचं काय?...पण त्याचबरोबर हेही खरं आहे की, दादासाहेब फाळकेंनी पहिला ‘सिनेमा’ बनवला होता तो एका रोपट्याची वाढ चित्रित करणारा... आज जवळजवळ सव्वाशे वर्षं झाली असतील त्याला... आजचा सिनेमा कुठे गेलाय?आजच्या जगाची आणि तंत्रज्ञानाची गती पाहता आधुनिक आशयाचं आणि आधुनिक आकृतीबंध घेऊन आलेलं हे समग्रजनांचं साहित्य खरंखुरं ‘लोकशाही’ व्हायला अजिबातच वेळ लागणार नाही.पु.भा., शं.ना. यांनी आपल्या आसपास वावरणारा सामान्य माणूस आपल्या साहित्यात आणला होता. आजही तेच होतं आहे. उलट, ‘लेखक’ अशी बिरुदावली न घेताही अनेक हात लिहिते झालेत आणि आपल्या आसपासचा माणूस चितारू लागलेत. या हातांना तर बळ मिळोच; पण असे असंख्य हात लिहिते होवोत आणि लेखक- वाचक या दोन्ही भूमिका सर्वांनाच करायला लागोत!