ठाणे - तलावाचे शहर म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरातील मासुंदा तलावाच्या सुशोभिकरणाच्या कामाचा नारळ मंगळवारी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते फोडण्यात आला. येत्या काळात याठिकाणी डीजिटल चित्रदर्शन, काचेची पारदर्शक गॅलरी आदींसह इतर सुशोभिकरणाची कामे केली जाणार आहेत.राजन विचारे यांच्या खासदार निधीतून तसेच ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे सुशोभिकरण केले जाणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी मासुंदा तलाव व सभोवतालचा परिसर हे रम्य प्रेक्षणीय स्थळ होणार आहे. यावेळी आ. प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक साहेब, महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश म्हस्के, नगरसेवक सुधीर कोकाटे, संजय वाघुले, नगरसेविका पल्लवी कदम, मृणाल पेंडसे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.मासुंदा तलाव परिसरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व पदपथ सुशोभीकरण, अत्याधुनिक नौका विहार, डीजिटल चित्रदर्शन, मासुंदा तलावातील शंकर मंदिराचे सुशोभिकरण, अहिल्यादेवी होळकर घाट, खुला रंगमंच, नाना नानी पार्क, सेल्फी पाँर्इंट, आवश्यक विद्युत कामे करण्यात येणार आहेत.
मासुंदा तलावाचा होणार कायापालट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2018 03:40 IST