मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या गोडदेव नाका येथे कारला धडक देणाऱ्या २ उत्तर भारतीयांनी कारमधील मराठी दांपत्यास मारहाण करून महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा नवघर पोलिसांनी दाखल केला आहे. आश्चर्य म्हणजे पोलिसांनी आधी तक्रार नोंद केली परंतु मनसेच्या विरोधानंतर गुन्हा दाखल केला.
मीरारोडच्या जेपी नॉर्थ संकुलात राहणारे सुशांत पवार हे पत्नी हसीना व लहान ७ वर्षांच्या मुलीसह कार मधून चालले होते. त्यावेळी भाईंदर पूर्वेच्या गोडदेव नाका जवळ दुचाकीने कारला धडक दिली. सुशांत यांनी जाब विचारला असता बोलाचाली होऊन सुशांत व पत्नी हसीना यांना मारहाण केली. हसीना यांना छातीवर हाताने धक्का देऊन विनयभंग केला. ह्यावेळी अन्य काही जणांनी जमून मारहाण केली, गाडीची मोडतोड केल्याचा आरोप केला जात आहे. तर आमची लहान मुलगी ह्या घटनेने घाबरली होती व आपण हल्लेखोरांना विनंती करून देखील आम्ही मराठी असल्याने मारहाण केली असल्याचा आरोप पवार दांपत्याने केला आहे.
सदर घटना ४ जून रोजी रात्री घडली असता पोलिसांनी सुरुवातीला अदखलपात्र नोंद केली होती. मात्र दुसऱ्या रात्री मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे, अनिल रानवडे आदींसह मनसैनिक पोलिस ठाण्यात जमले व मराठी माणसांवर परप्रांतीय उत्तर भारतीयांनी केलेला हा भ्याड हल्ला सहन करणार नाही असा इशारा दिला. त्या नंतर पोलिसांनी अरुण शिवप्रसाद दुबे (वय ५३) व संजू अशोककुमार सिंग (वय ४७) दोघे रा. साई गुडिया बिल्डिंग, नवघर मार्ग यांच्यावर विनयभंग सह मारहाण आदीनुसार गुन्हा दाखल केला आहे. मराठी माणसांवर गुंडगिरी दादागिरी केल्यास मनसैनिक अद्दल घडवतील. सीसीटीव्ही फुटेज तपासून जमलेल्या अन्य लोकांना देखील आरोपी करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे असे संदीप राणे म्हणाले.