भिवंडी : शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम व मुंबई महानगरपालिकेने पाणीकपात केल्याने शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. मात्र, पाण्याचे नियोजन नसल्याने दोन दिवस पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वाढत आहेत.शहरातील पाण्याचे स्रोत महानगरपालिका प्रशासनाने कमी केल्याने वाढत्या लोकसंख्येसाठी स्टेम व मुंबई मनपाकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे. सध्या शहरातील नागरिकांना वऱ्हाळा तलावातील दोन एमएलडी, स्टेम व मुंबई मनपा या दोन ठिकाणांहून एकूण १०८ एमएलडी पाणीपुरवठा होतो. तो करताना नियोजन नसल्याने काही ठिकाणी २४ तास तर काही ठिकाणी २ तासही पाणी सोडले जात नाही. मुंबई महानगरपालिकेने २० टक्के पाणीकपात केली आहे. तसेच दर बुधवारी सकाळी ९ ते गुरुवारी ९ वाजेपर्यंत स्टेमचे पाणी बंद असते. त्यानंतर, रिकाम्या जलवाहिनीतून आलेले पाणी काही ठिकाणी पोहोचण्यास उशीर लागल्याने ते शुक्रवारी पोहोचते. अशा जलवाहिनीवरील पाणी सोडण्याच्या वेळेत बदल केले पाहिजेत, अशी मागणी त्या भागातील रहिवासी करीत आहेत. प्रभाग समिती ५ मधील जुन्या भिवंडीतील रहिवाशांना नियमित पाणी देण्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहरातील नागरिकांच्या पिण्याचे पाणी अनेक ठिकाणी कापडावर प्रक्रिया करणाऱ्या डाइंगमध्ये व सायझिंगमध्ये सोडलेले आहे. तसेच वाहने धुणाऱ्या सर्व्हिस सेंटरधारकांनी पाणी चोरले आहे. इमारत बांधकामासही चोरीचे कनेक्शन दिले आहे.
ऐन पावसाळ्यात भिवंडी मनपाची पाणीकपात
By admin | Updated: September 5, 2015 22:24 IST