ठाणे : इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतनासाठी ठाणे, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर या महापालिका, अंबरनाथ नगरपालिका आणि ग्रामीण भागातील कल्याण, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या तालुक्यातील केवळ ५ हजार ३०३ वयोवृध्द स्त्री-पुरूषांची निवड झाली आहे. या लाभार्थ्यांना आता दरमहा २०० रूपये निवृत्त वेतन मिळणार आहे. सर्वात कमी ११० लाभार्थी ठाणे ग्रामीण मधील असून त्यांना जुलैअखेर एक लाख सात हजार रूपये निवृत्ती वेतन दिल्याचा दावा आहे.या निवृत्ती वेतन योजनेसाठी ६५ वर्षे व त्यावरील वयोवृध्दांची निवड झाली आहे. यासाठी लाभार्थी ठरविलेले वयोवृध्द दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीतील आहेत. त्यांना वृध्दापकाळ निवृत्ती वेतन म्हणून २०० रूपये दरमहा त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. यासाठी केंद्र शासनाकडून ५४ कोटी ४३ लाख रूपये अनुदानही प्राप्त झाले असून जुलै अखेर त्यापैकी ४३ कोटी २८ लाख रुपये या वृद्धांना दिले असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.सर्वाधिक एक हजार ४४ लाभार्थी भिवंडी मनपा क्षेत्रात असून त्यांना मेपर्यंत सहा लाख ६३ हजारांचे वाटप केले आहे. याखालोखाल भिवंडी ग्रामीणमध्ये ९८० लाभार्थी असून त्यांना सहा लाख ३६ हजार वाटप झाले आहे. उल्हासनगर मनपा क्षेत्रात ७९३ वयोवृध्दाना जुलै अखेर आठ लाख ३२ हजार दिल्याचे प्रशासनाने सांगितले. मुरबाड तालुक्यातील ७१८ वयोवृध्दाना दोन लाख २० हजारांचे वाटप झाले. शहापूर तालुक्यात केवळ ४२१ लाभार्थी असून त्यांना सात लाख १८ हजारांचे निवृत्ती वेतन दिले आहे. अंबरनाथ न.पा.क्षेत्रात ४९८, ग्रामीणमध्ये २६६ तर कल्याण मनपात १८४, ग्रामीणमध्ये १६०, ठाणे मनपात १२९ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला.
५,३०३ वयोवृद्धांना निवृत्तीवेतनाचा लाभ
By admin | Updated: September 8, 2016 02:44 IST