सोलापूर: उजनी ते सोलापूर या जलवाहिनीवर ठिकठिकाणी पाणी चोरण्याचे प्रकार सुरू असून, ज्यांनी पाणी चोरले त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे सुरू झाले आहे. कुणी किती पाणी वापरले याबाबत मनपाकडून अहवाल आल्यानंतर संबंधित पाणी चोरांच्या सात-बारावर तेवढय़ा रकमेचा बोजा चढविला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी पत्रकारांना दिली.दरम्यान, महापालिकेच्या पथकाने गुरूवारी पहाटे टेंभुर्णी पोलीस ठाण्यात १२ तर मोहोळ येथे ५ अशा १७ शेतकर्यांविरूद्ध पाणी चोरीचे गुन्हे दाखल केले. ३ कोटी ३७ लाख ४७ हजारांचे पाणी चोरून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. गुरूवारी तेलंगवाडी, वरवडे टोलनाक्याजवळ प्रत्येकी एक आणि आकुंबे येथे पाईपलाईनला छिद्र पाडून ओढय़ात पाणी घेऊन सामूहिक चोरी केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे काम गुरूवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पोलिसांनी बुधवारी गणेश माने याला अटक केली होती. आज सूत्रधार ज्योतिबा काकडे याला ताब्यात घेतले. तो महापालिकेत चालक म्हणून सेवेत आहे. आता या दोघांच्या चौकशीतून आणखी कोणाची नावे बाहेर येतात याकडे सर्वांचे लक्षलागले आहे. महापालिका आयुक्त विजयकुमार काळम-पाटील यांनी जातीने लक्षघालून धाडसी कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.
पाणी चोरांच्या सात-बारावर बोजा चढविणार -जिल्हाधिकारी
By admin | Updated: July 24, 2015 20:08 IST