करमाळा : करमाळ्यातील मौलाली नगरमधील मदारी समाजाच्या दोन बालकांचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना आज दुपारी उघडकीस आली. मौलाली माळावरील सापवाले-मदारी समाजातील दोन मुले बुधवारी सकाळपासून अल्ताफ फत्तू मदारी (वय १२) व उस्मान फारुक मदारी (वय- १०) हे दोघे घरातून बेपत्ता झाले होते. याबाबत करमाळा पोलिसात फत्तू मदारी यांनी ही मुले दुपारपर्यंत घरी न आल्याने हरविल्याबाबत खबर दिली होती. आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मौलाली नगरातीलच मौलाली दर्ग्याच्या पाठीमागील विहिरीत अल्ताफ मदारी हा तरंगताना आढळून आला. यानंतर विहिरीत मौलाली नगरातील युवकांनी पोलिसांना खबर देऊन शोध घेतला असता उस्मान मदारीही आढळून आला. मयत अल्ताफ व उस्मान हे दोघे सख्खे चुलत भाऊ होते. या घटनेमुळे मौलाली नगरात दु:खाचे सावट पसरले होते. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मयताचा गुन्हा नोंद झाला आहे.
दोन बालकांचा विहिरीत बुडून मृत्यू
By admin | Updated: June 27, 2014 01:12 IST